Tuesday, November 27, 2018

गुह्यत्वाचा साक्षात्कार

👏👏👏

*_गुह्यत्वाचा साक्षात्कार_*

ह्या प्रवचनातील महत्वाचा मुद्दा असा, तो म्हणजे *आपल्या सद्गुरू मातेचे अनंताप्रत झालेले प्रयाण.* ज्यावेळेस बाबांनी अनंतांना प्रणव दिधले, त्याच वेळेस आपली माता अनंतांप्रत जाण्यास सज्ज झाली. तिचे मार्गक्रमण हे बाबानी सांगितल्याप्रमाणे *तीन टप्प्यांत* झाले आणि ते तीन टप्पे पार पडण्यासाठी स्वतः अनंतांनी व पितामहांनी पाठीमागे राहून सहाय्य केले होते. 

हे निर्वाण कार्य ज्यावेळेस घडत होते, तेव्हा माता ही ज्योती स्वरूपात आणि तीन टप्प्यांत अनंतांप्रत प्रयाण करती झाली. या प्रयाणा दरम्यान मातेने टप्प्याटप्प्याने *चार देहांचा - स्थुल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण - त्याग केला होता,* परंतु या घटनेची साक्षीदार असलेली योगीनी हिला देखील ते चार देह येथे कसे ठेवले ते काही कळले नाही. याबाबत आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हटल्याप्रमाणे, "त्या गोष्टीची जाण - त्या गुह्याची जाण योगीनीलाही दिली नाही."

आपणास कल्पना असेलच की माणूस मृत झाला असता प्रथम त्याचा श्वास बंद पडतो, अर्थात सत बाहेर पडते. श्वास म्हणजेच नाम बंद पडते. हा झाला स्थुल देहाचा भाग. इतर देहाने तो तेथेच आजूबाजूला असतो, कारण इतर तीन देहांचा नाश फक्त आणि फक्त अनंतच करू शकतात, इतर कुणीही नाही. यालाच आपण मानव मृत झाला असे म्हणतो.

तर अशाप्रकारे चार देहांचा त्याग करून माता अनंतांप्रत चालली असताना ती देह रूपी न जाता ज्योती स्वरूपात जात होती. शेवटी चारही देहांपलीकडे गेल्यावर मातेची ज्योत अनंतांमध्ये एकरूप झाल्याचे वर्णन त्यावेळेस या घटनेची साक्षीदार असलेल्या योगीनीने केले होते.

अशाप्रकारे मानव सरळसरळ अनंतांप्रत जाऊ शकत नाही, परंतु माता त्या नियमाला अपवाद होती. हे शक्य झाले आपल्या श्री सद्गुरू माऊलींमुळे. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, ती म्हणजे, *आपले सद्गुरू हे कोण होते व आहेत?*

या सव्वीसाव्या अवतार कार्यात मानव रूप धारण केलेले आपले सद्गुरू हे - निराकार आणि आकार - ह्यातील आकार रूपी ॐकारच होत, त्याचप्रमाणे निराकारही होत. त्यामुळेच त्यांची शक्ती - आद्यशक्ती - ही आपली माता, मानवी त-हेने त्यांच्याच आदेशावरून - निराकाराने अर्थात अनंतांनी आपल्यात सामावून घेतली. तिची जागा तीच होती आणि आहे देखील. ती इतरत्र कशी जाणार? त्यामुळे ती त्यांच्यातच सामावली गेली. 

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

No comments:

अनगडवाणी