Saturday, August 21, 2010

गुरूचा महिमा !!!

तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे. तुम्हाला त्याच्या घरी येण्याची वाट दाखवायला तो उत्सुक आहे. त्याच्या आज्ञेत राहूनच आपण आयुष्यात चांगलं काही करू शकतो. प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र राहून दानधर्म करणं हा आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, आपलं कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

...........................................................................................................................

कठीण परिस्थितीतून जाणारे लोक ब-याचदा आकाशाकडे पाहून, गुरूला किंवा देवाला दोष देतात आणि म्हणतात, माझ्याच वाट्याला हे दु:ख का आलं आहे? पण प्रत्यक्षात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांच्यावरील गुरू किंवा देवाच्या प्रेमामुळेच त्यांच्यावर ही कठीण परिस्थिती (आलेली नसून त्यांच्या पूर्व जन्माचे ते सुकृत आहे.) या परिस्थितीच्या रूपानं त्यांना 'स्वच्छ' केलं जातंय. अंगाला लागलेली घाण साफ करावी, तसं त्यांच मन, अंतरंग स्वच्छ केलं जात आहे. त्यांची शुश्रूषा केली जात आहे. जर त्यांना स्वच्छ होण्याच्या या प्रक्रियेतून जाताना मनोमन उमगलं की, त्यांच्या देवाचं त्यांच्यावर इतकं प्रेम आहे की, त्याला त्याच्यावरील सारा चिखल, सारी घाण धुवून टाकून त्यांना स्वत:जवळ नेण्याची इच्छा आहे, तर ते जगणं मौजेचं होईल नाही का?

शुद्ध सोनं मिळविण्यासाठी सोन्याला अधिक दाहक आगीतून काढावं लागतं. शुद्ध पाणी हवं असेल तर उकळून घ्यावं लागतं. ही मोठी सुखकर क्रिया नव्हे. प्रत्येक गोष्टीला शुद्ध आणि पवित्र बनण्यासाठी त्याच्या स्वत:च्या अशा विस्तवातून जावं लागतं. सितामाईला नाही का अग्नीदिव्यातून जावे लागले?

कल्पना करा, दोन मुलं मातीत खेळत आहेत. दोघांनाही इजा झालेली आहे. त्यातल्या एका मुलाची आई मुलाला गरम पाण्यानं स्वच्छ करते. जिथं मुलाला लागलं आहे, तो भाग जंतुनाशकानं स्वच्छ करते. त्या जंतुनाशकानं त्या मुलाला नक्कीच झोंबेल. ते मूल वेदनांनी ओरडेल. यातनांनी रडेल. कदाचित् आईवर ओरडेल. परंतु, ती माऊली काळजावर दगड ठेवून मुलाच्या जखमा साफ केल्यावाचून राहणार नाही. कारण तिच्या हृदयात आपल्या मुलांबद्दलचं खरंखुरं प्रेम असतं.

परंतु, दुसरं मूल अजूनही घाणीत खेळत असतं. त्याच्या जखमेवर कुणी औषध लावत नाही. या दोघा मुलांमध्ये फायदा कोणाचा आहे?

वास्तविक सर्व समस्यांची उत्तरं, प्रत्येक माणसापाशीच असतात. त्या माणसाला फक्त शांत राहून अंतर्मनाचा मागोवा घ्यायचा असतो. आपल्या श्वासावर चित्त केंन्द्रित करा आणि हळुहळू आपल्या खऱ्या घराकडे प्रवास सुरू करा. त्यासाठी कोणत्याही माध्यमाची, आश्रमाची, पुस्तकांची, खोट्या गुरूची आपल्याला गरज नसते. गरज असते, फक्त विश्वासाची. तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे आणि तुम्हाला आपल्या घरी नेण्याची वाट दाखवायला उत्सुक आहे.

तुम्ही शांत बसा, डोळे मिटून घ्या, सारे विचार बाजूला सारा, तुमचं चित्त श्वासावर केंन्द्रित करा. तुम्हाला जाणीव होईल की, तुम्ही म्हणजे तुमचा मूतिर्मंत श्वासच झाला आहात. तुमच्या श्वासाबरोबर तुम्ही अशा दुनियेत पोहोचला आहात, जिथं प्रसन्नता, शांतता, आध्यात्मिकता, ऋषी आणि साक्षात्कारी महापुरुषांचं राज्य चालतं. तुमची सारी उत्तरं तुमच्या ठायीच आहेत. ती बाहेर नाहीत. ऊर्जावलयं, चक्र, अतिमानवी, नवं जग, सारे भपकेबाज शब्द विसरा. आधी प्राथमिक शब्दाशी संपर्क साधा, हा शब्द आहे, शून्याची पोकळी. त्या शून्याच्या पोकळीतच तुम्हाला जगाचा निर्माता भेटेल. त्यानं सारं काही शून्यातून उभं केलं. त्याच्यापाशी पोहचायला तुम्हाला शून्याच्या पोकळीकडे वाटचाल केली पाहिजे.

आपण शून्याकडे जायला वेळ लावतो. का? उत्तर सोपं आहे. जर तुम्ही कोडं निर्माण केलंत, तर ते सोडवायला खूप कठीण पडेल. खरंतर कोडं सोडवायला अगदी सोपं असतं. पण आपण घेतलेला प्रत्येक मार्ग, प्रत्येक पाऊल आपल्याला त्या सोपेपणापासून दूर, गहनतेच्या जाळ्याकडे घेऊन जातं. आपण उत्तरापासून दूर दूर जाऊ लागतो. देव साधा आहे, इतर सारं गहन आहे. तुम्ही साधेपणा, पावित्र्य यांच्याकडे वळा. त्याद्वारे देवस्वरूप बना. ध्यान आणि प्रार्थनेनं माणूस फक्त कर्माचं किल्मिषच जाळून टाकत नाही, तर त्यामुळे संरक्षक कवचही निर्माण होतं. एकतर प्रार्थनेमुळे संकट टळेल किंवा नशिबात लिहिलेलं संकट स्वीकारण्यासाठी माणसाला बळ, शहाणपण आणि प्रेम लाभेल. हे संकट उमदेपणानं, आनंदानं आणि समर्पणाच्या भावनेनं स्वीकारता येईल.

आयुष्यात माणूस सर्वांत चांगलं जे करू शकतो, ते म्हणजे, प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र, मृदू आणि दयाळू राहून दानधर्म करणं. आपल्या कर्माची थकबाकी चुकवण्याचा, कर्म भोगून संपवण्याचा, स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवण्याचा हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रार्थना, ध्यानधारणा आणि देवानं आपल्यासाठी योजलेल्या साऱ्याचा सकारात्मक भावनेनं केलेला स्वीकार.

गुरूला पूर्ण शरण जाणं म्हणजेच देवाशी एकरूप होण्याचा एकमेव मार्ग. देता येईल तेवढं द्या, देत राहा... जमेल तेवढं देत राहा. गरीब माणूस फारसे पैसे देऊ शकणार नाही. पण तो किंवा ती एक चांगलं माणूस बनू शकतील. कुटुंबीय, मित्र आणि शक्य तेवढ्या सर्वांना मदत करू शकतील. एक चांगलं माणूस बनून, तुम्ही सवोर्त्कृष्ट प्रकारचा दानधर्म करत राहाल.

........................................................................................

(
लेखकाच्या 'द फकीर' (रूझबेह एन भरूचा ) (अनुवाद: सुनीती काणे) या पुस्तकातील अंश) सौजन्य : लोकसत्ता


Mayur Tondwalkar

अनगडवाणी