Wednesday, June 6, 2018

निवृत्ती म्हणजे काय ?

निवृत्ती म्हणजे काय ?

      "नि"वृत्ती म्हणजे  = निरागस वृत्ती.

आयुष्याचा आपला बहुमोल कालावधी जो आपण आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी घालवितो आणि मग त्यातून आयुष्याची अठ्ठावण्ण किंवा साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार कार्य करण्याचे थांबवितो, यालाच विशेषकरून निवृत्ती असे म्हटले जाते. ही झाली व्याख्या.

पण खरच आपण निवृत्त होतो कां ?
खरे पाहता, आपण वयोमानानुसार नोकरीतून निवृत्त होतो, कर्तव्यातून नव्हे. उलटपक्षी आपली रोजची कामे कमी न होता वाढतच जातात. आपले हे नोकरीतून निवृत्त होण्याचे वय म्हणजे आपल्या मुलामाणसांमध्ये कर्तव्यरत असण्याचे वय.

अशावेळेस मुलांमुलींची लग्ने होतात, त्यांना मुले-बाळें होतात अर्थात आपण आजी-आजोबा होतो. नात्रां-गोत्रांत रममाण होतो आणि या मायेच्या रहाटगाडयात पुरते अडकून जातो.

आपली व्यावसायिक वृत्ती ब-याच अंशी लोप पावली जाते व आपण निरागस वृत्तीकडे म्हणजेच निवृत्तीकडे झुकण्यास सुरूवात करतो. आपण बालकांसारखे होऊन त्यांच्यासोबत एक बालकच होऊन राहतो. त्यांच्याप्रमाणे आपणही निरागस होऊन वाटचाल करण्यास प्रारंभ करतो. त्यांच्यासोबत खेळतो, बागडतो, त्यांच्यासारखेच लहान होतो.

तसे पाहिले तर आपण आपल्या नवीन आयुष्याला ख-या अर्थाने सुरुवात करीत असतो. बालक जसे आपल्या बालपणी आयुष्याची सुरुवात करीत असते, तसेच निवृत्त माणसाच्या आयुष्याची दुसरी सुरुवात देखील येथूनच निवृत्तीतूनच होत असते. त्यांची देखील स्थिती त्या निरागस बालकाप्रमाणेच असते. म्हणूनच म्हणावेसे वाटते निरागस वृत्ती म्हणजेच निवृत्ती.

निवृत्तीचा दुसरा अर्थ म्हणजे सायंकाळ.

मानवाची पहाटे उठल्यापासून जी आयुष्याची सुरुवात होते ती सायंकाळ होईपर्यंत सातत्याने चालूच असते. अर्थात सायंकाळ म्हणजेच निवृत्तीचा काळ.

दिवसभर धावपळ करून, काबाडकष्ट करून मानव संध्याकाळी आपल्या घराकडे जसा परत फिरत असतो, तसाच तो आयुष्यभर धावपळ करून सरतेशेवटी निवृत्तीकडे प्रयाण करीत असतो. हा काळ मानवाची सायंकाळ होय. सायंकाळनंतर येते ती रात्र. म्हणजेच कार्य समाप्तिचा कालावधी. निवृत्तीनंतर मानवाची वाटचालही त्याच्या आयुष्याच्या समाप्तिकडेच सुरू झालेली असते.

अस्मादिकानी  एके ठिकाणी म्हटलेलेच आहे,

आनंद जाहला मनी
  या निवृत्तीच्या क्षणी
पाहूनीया माळा गळा
  आनंदची होई सकळा
कर्तव्यातून झाली मुक्ती
  नाही आता कामाची सक्ती
मुक्तपणे हिंडा-फिरा
  मनसोक्तपणे मारा चकरा
दिस येतील, दिस जातील
  लोक मात्र म्हणतील,
  "रामकृष्णहरि, रामकृष्णहरि".....!!!
...........(मयुर तोंडवळकर)...........

अनगडवाणी