Wednesday, October 24, 2018

प्रवचन

आजच्या प्रवचनातून आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ब-याच गोष्टी उघड करून सांगितलेल्या आहेत. त्याचे स्मरण ठेवून जर कां आपण सर्वांनी मार्गक्रमणा केली, तर ती सद्गुरू माऊली आपणास आपल्या अगदी जवळ घेतल्याशिवाय कदापिही राहणार नाहीत.👏 *_अनगड_*👏

श्री सद्गुरू माऊली म्हणते, *समर्थ उपदेश करीत असतात ते सेवेकरी गरीबी, लाचारी, रोगग्रस्त या मार्गाने सेवेकरी जाऊ नये म्हणून.* हा उपदेश कसा असतो? तर *तो बोधक* म्हणजेच बोध घेण्यासारखा असतो. त्यापासून बरेच शिकण्यासारखे असते.

आपले बाबा पुढे जेव्हा समर्थांबद्दल बोलतात ते तर अतिशय महत्त्वाचे आहे. बाबा म्हणतात, *"समर्थ फार दयाघन आहेत. ते भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी कधी पिता बनतात, तर कधी बालक देखील बनतात. ते लोण्यासारखे मऊ मुलायम असून, त्यांना आपल्या भक्ताबद्दल दया ही येतच असते, ती किती? तर दुस-या कुणाला येणार नाही इतकी."* हे सांगताना ते एवढे मोठे श्रेष्ठ तत्व स्वतः असताना, विनम्रपणे, लिनतेने म्हणतात, *मी यत्किंचित पामर काय करू शकणार? समर्थ दयाद्र दृष्टीने पाहणार.*

श्री सद्गुरू माऊली पुढे आपणा समस्तांना आठवण करून देताना म्हणतात, *ज्या सेवेक-यांनी सद्गुरू मेख ओळखली तो सेवेकरी हेलावणार.*

सताचे गुपित हे गुपित न ठेवता, ते गुपित उघड करताना ते म्हणतात, *अशाप्रकारे सत् पदाच्या आदेशाने जर कां ज्योत वागू लागली, तर त्यांचा (सताचा) ठाव घेणे सोपे आहे. अन्यथा वज्रापेक्षा कठीण आहे.* 

आता येथे हा विचार करणे आपणास गरजेचे आहे की, आपण अशाप्रकारे सताच्या आदेशांचे पालन करतो कां? त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण वागतो कां? त्यांनी घालून दिलेल्या नितीनियमांचे आपण किती पालन करतो? आपण नित्यनेमाने *नामस्मरण* करतो कां? हे जर कां सर्वस्व आपणाकडून घडत असेल, तर आणि तरच ते सत् आपणास त्यांचा ठाव देईल, अन्यथा नाही. 

_येथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की सत् तत्वास ज्या वेळेस वाटेल की ही ज्योत आता आपला ठाव देण्यायोग्य झालेली आहे, त्यावेळेसच आपल्याला त्या सताचा ठाव घेता येईल, अन्यथा नाही. सतच आपणास तिचा ठाव देईल._

*सताचा ठाव घेणे हे ये-यागबाळ्याचे काम नोहे.*

पुढे बाबा म्हणतात, *"सद्गुरू माऊली कृपेची सावली"* आहे आणि हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. अशा त्या माऊलींची कृपा सर्वस्व अधिष्ठीत असते. पुढे बाबा म्हणतात, *माऊलीला मुलांचे प्रेमही असते.* हे जरी खरे असले तरी मुलालासुद्धा सद्गुरूंबद्दल ओढण ही असलीच पाहिजे.

इतकेच नव्हे तर सगळ्यांत महत्वाचे म्हणजे, *भक्ताकडे ही भावना पाहिजे की, "मी सद्गुरूंचा व सद्गुरू माझे आहेत." त्यांच्यात आणि माझ्यात द्वैत नाही.*

_हे फक्त म्हणण्यासाठी नसून सर्वार्थाने ते असावयास हवे._

तेव्हाच बाबा म्हणतात, *अशावेळी ते हेलावतात.* पण त्यासाठी तोंडाने म्हणजेच *उक्तीने* आणि *कृतीने* ज्योत सद्गुरूमय असावयास हवी. त्याचवेळी *त्रिभुवनी देखील ती वंदनीय ठरते.*

सद्गुरू माऊली पुढे म्हणतात, *जो त्या ठिकाणी स्थिर झाला, तो दूर होणे शक्य नाही व विशेष म्हणजे सद्गुरू त्याला दूर लोटणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे.*

परंतु एवढे सगळे म्हटल्यानंतर देखील श्री सद्गुरू माऊली दु:खी होऊन पुढे असेही म्हणतात, *पण सेवेक-यात अजूनही सुधारणा झालेल्या नाहीत.* ही गोष्ट आपणास खचितच कौतुकास्पद आहे असे वाटत नाही.

बाबा आता म्हणतात, *समर्थ प्रथम (ज्योतीची) बुद्धी शुद्ध आहे कां ते पाहणार.* 

_त्यासाठी तुम्ही स्फटिकासारखे नितांत शुद्ध रहा. एकदा का त्यांनी तुम्हाला माझें म्हटले तर तुम्ही धन्य होय._

श्री सद्गुरू बाबा पुढे म्हणतात, *समर्थ आपल्या सेवेक-यासाठी अहर्निश झटत असतात. ते कधी नाराज होणार नाहीत. सद्गुरू माऊलींसारखे परम् दैवत नाही. सद्गुरू तुमचे कुळ, मुळ व पूर्वज.*

_विशेष उल्लेखनीय बाब आता पुढेच आहे. श्री सद्गुरू माऊलीने सताची तत्त्वे आणि त्यांचा क्रम आपणापुढे उघडपणे काही अंशी मांडून ठेवला, तो येणेप्रमाणे -_

            *पहिले सत*
            *सतापासून*
      *श्रीहरी ( क्षिराब्धी )*  
           *श्रीहरींपासून*       
                *त्रिगुण*
   *ब्रह्मा*   *विष्णू*   *महेश*
                   आणि
        _तद्नंतर सर्वस्व जगत_

Tuesday, October 23, 2018

......आले कोठून व केव्हा?

*मुसलमान हे सतयुगात होते काय?* 
तर त्याचे उत्तर नाही म्हणूनच येईल. मग हे मुसलमान आले कोठून व केव्हा?

श्री कृष्णांना सांब नावांचा मुलगा होता. तो खुप द्वाड होता. त्याला दुर्वास वा विश्वामित्र म्हणा ऋषींची, खोड काढण्याची लहर आली. म्हणून त्यांने आपल्या पोटासभोवती कपडे गुंडाळून व स्त्री अवतार धारण करून त्यांच्यासमोर हजर झाला व विचारता झाला, "सांगा बरे माझ्या पोटात कोण वाढत आहे?"

ऋषीनी सांबाला तक्षणीच ओळखले होते व त्याच्या या खोडकर वृत्तीला देखील समजले आणि म्हणूनच त्यांनी रागाच्या भरात सांगून टाकले की तुझ्या पोटात जे आहे, ते मुसळ म्हणून जन्माला येईल आणि त्यामुळेच तुझ्या पित्याचा मृत्यू ओढवेल व यादव कुलाचा नाश देखील होईल.

झालेही तसेच. ऋषींची ही वाणी खरी ठरली. आता ह्याचे निराकरण कसे करायचे, ह्याचा प्रश्न आ वासून त्याच्या समक्ष उभा ठाकला. कपडे सोडून पाहतो तर काय? साक्षात मुसळच प्रगट झालेले. आता ऋषींची ह्या पुढील वाणीही खरीच ठरणार, ह्यात तीळमात्रही शंका उरली नव्हती आणि तसे होऊ नये म्हणून सांबाने त्या मुसळाची अनेक बारीक बारीक शकले करून नदी किनारी फेकून दिलीत. त्याचीच पुढे अनेक मुसळे निर्माण होऊन, आपसातील युद्धात, शस्त्रे म्हणून त्यांचा वापर होऊन यादव कुलाचा नाश देखील झाला.

ह्याच मुसळांपासून पुढे मुसलमानांची पैदास झाली. मुसळांपासून निर्माण झालेले म्हणून ते मुसलमान. पूर्वाश्रमीचे हे हिंदूच होत. ह्यांच्या बहुतेक चालीरीती ह्या नेमक्या हिंदू धर्माच्या उलट्या असतात. ह्यांचे जे पीर असतात, तेच मुळी आपल्या नाथांकडून दिक्षा घेतलेले असतात. 

हे जे हजची यात्रा करण्यासाठी मक्केला जातात, ते स्थान आपल्या श्री शंकरांचे स्थान असून तेथे शिवलिंग असल्याचे अलिकडील संशोधनातून उघड झालेले असून, ते जगजाहीरही होऊन, त्याबाबतचे विडीयो युट्यूबवर उपलब्ध देखील झालेले आहेत.

Sunday, October 21, 2018

_प्रारब्धाची रेषा पुसता येते_

🙏🙏🙏

_प्रारब्धाची रेषा पुसता येते असे श्रीसमर्थ रामदास स्वामी छातीठोकपणे सांगतात हे सत्य होय._

अशी कित्येक उदाहरणे आपल्या दरबारात आपल्या श्री सद्गुरू माऊलीनी त्यावेळी प्रत्यक्षात घडवून आणलेली होती आणि ती आपल्यातील ब-याचजणांनी अनुभवली देखील आहेत.

श्रीसमर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट येथे प्रकर्षाने आठवते ती म्हणजे, "श्रीसमर्थ रामदास स्वामी" ह्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी याच दरबारात आल्यावर आपल्या श्री समर्थ सद्गुरू माऊलींसमोर छत्रपतींना दर्शन देण्यात यावे यासाठी आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या देखील पणाला लावली होती. असे ते श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस हे म्हणतात, ते खरेच होय.

येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळी असे म्हणतात की, *माझी आदीअंतापासूनची जी तपःश्चर्या आहे, ती आपल्या चरणांवर सता*! *मी वाहण्यास तयार आहे, परंतु सता*! *माझ्या शिवबाला आपले दर्शन द्या.* याचाच अर्थ असा होतो की, *श्रीसमर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापूर्वीही होते, इतकेच नव्हे तर आदीअंतापासूनही होतेच.*

मग हे श्रीसमर्थ रामदास स्वामी कोण होते? तर ज्यांच्या नावातच जो *राम* दडलेला आहे, त्यांचे ते *दास* म्हणजे सेवेकरी होते. म्हणूनच ते स्वतःला रामाचा दास येणे *रामदास* म्हणवून घेत असत. 

सत् युगात श्री राम होऊन गेले. त्यावेळी श्री रामांबरोबर कोण होते? तर प्रत्यक्ष *श्री मारूतीराय.* श्री मारूती हे रूद्रच होते आणि शिवकालीन श्रीसमर्थ रामदास स्वामी हे दुसरे तिसरे कुणी नसून, प्रत्यक्ष रूद्र देवतेचाच अवतार होते.

याचाच अर्थ असा होतो कि, श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्यक्ष श्री रूद्र देवतेनेच आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणांवर वाहण्यास (म्हणजेच ॐ कारांच्या चरणी) आपली विनम्रता दर्शविली. *धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी.*

ज्या ज्या वेळी श्रीसमर्थ रामदास स्वामी दरबारात एकचित्त होत, त्या त्या वेळी ते *आदेश अल्लख* न म्हणता आपली स्वतःची अशी ललकारी देत, ती म्हणजे *जssय जssय श्री रघुवीर समर्थ* एका लयबद्ध स्वरांत जेव्हा त्यांच्या मुखातून ही ललकारी बाहेर पडत असे, तो क्षण ऐकण्यासारखा व अनुभवण्यासारखाच क्षण असावयाचा. अंगावर रोमांच उभे राहावयाचे. धीर गंभीर आवाजातील श्रीसमर्थ रामदास स्वामींची ललकारी ऐकणे म्हणजे महत् भाग्यच होते. ज्यांनी ज्यांनी हा प्रसंग पाहिला, अनुभवला ते खरोखरीच भाग्यवान. या ललकारीनेच संपूर्ण वातावरण भरून जायचे.

अशा या सद्गुरूंचा सेवेकरी श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जेव्हा आपल्या श्री सद्गुरू माऊलीने प्रत्यक्ष दर्शन दिले, तो प्रसंगही आज डोळ्यांसमोर उभा राहतो. ह्या दर्शनाचे वैशिष्ठ्य हे होते की, श्री छत्रपती शिवाजी महाराज एकचित्तता साधतात तेव्हा, ते ज्या ज्योतीमध्ये एकचित्त होत, ती ज्योत चक्क आसन सोडून अर्ध स्थितीत एका पायावर उभी राहावयाची, कंबरेत वाकावयाची आणि नंतर त्रिवार मुजरा करावयाची. म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष श्री सद्गुरू माऊलींना मुजरा करून दर्शन घ्यावयाचे व दर्शन घेऊन झाल्यावर, ते जेव्हा पुन्हा आपल्या स्थानी विराजमान होत, तो ही प्रसंग डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखाच होता. किती लयबद्ध आणि शांतपणे ते अर्ध स्थितीत उभे राहावयाचे, तेवढ्याच शांतपणे आणि लयबद्धपणे ते पुन्हा बसायचे, हे कुणीही पाहू शकले नसते, ते त्यावेळी काहीजणांना पाहता आले, ते केवळ आणि केवळ श्री सद्गुरू माऊलींमुळे.

ह्याबद्दल सांगताना स्वयम् श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सत्य उघड केले की आजपर्यंत त्यांनी अशाप्रकारे मुजरा फक्त श्री तुळजाभवानी, श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि आपली श्री सद्गुरू माऊली (म्हणजेच ॐ कार) यांना सोडून कुणालाच केलेला नाही.

💐🙏💐👏💐🙏💐👏💐

Saturday, October 20, 2018

दसरा


एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत

👏👏👏

*एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत*
एकाचा म्हणजे कुणाचा?
तर तो एक म्हणजे अनंत, तो एक म्हणजे अपुली श्री सद्गुरू माऊली, तो एक म्हणजे साक्षात ॐ कार.
हे शक्य आहे कां?
म्हटले तर होय, म्हटले तर नाही.
हे शक्य कोणाला आहे? तर जो भक्त त्या अपुल्या सद्गुरू माऊलींशी तन, मन आणि धनाने तादात्म्य पावला आहे त्यालाच. तसेच त्या सद्गुरू माऊलींची इच्छा असल्यास, तरच हे त्या भक्ताला ते शक्य होते, अन्यथा नाही.
*द्वैत आणि अद्वैत काय आहे?*
अशुद्धत्वता आणि शुद्धत्वता. बाबा म्हणतात, *मन शुद्ध तेथे अद्वैत आहे आणि जेथे मन अशुद्ध तेथे द्वैत आहे.*

*संसार करून परमार्थ साधणे* हाच बाबांच्या मते अद्वैत सिद्धांत होय व तोच श्रेष्ठ होय.

पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत सिद्धांत हा निराकारी आहे.* *सत् हे आकार रहीत असते.*

*आकारी जे आहे, ते द्वैत आहे आणि ह्याला कारण माया आहे.*

बाबा पुढे म्हणतात, *तमोगुण म्हणजे तामस गुण म्हणजेच अंधार होय.* येथे विचार सापडत नाही, तर येथे अविचारच सापडतो. येथे प्रकाश सापडणार नाही.

*त्रिगुणी माया काय आहे?*
रज, तम आणि सत्व गुण जेथे एकत्र येतात, तेथेच ही त्रिगुण नटलेली माया साकारताना दिसून येते. हे त्रिगुण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच म्हटले आहे, ही त्रिगुणात्मक आहे. अर्थात त्रिगुण नसतील तर संसार होणार नाही ह्याची बाबा पुढे आपणास आठवण करून देतात.

*बाबा श्रीमान कुणाला म्हणतात?*
सताचा जो सेवेकरी तो बाबांच्या मते खरा श्रीमान. फक्त धनवान किंवा सावकार तो श्रीमान नव्हे. दूस-यांचे हित करणारा तो बाबांच्या मते श्रीमंत.

म्हणूनच पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत भक्ती ही श्रीमान आहे.*

बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *हा दरबार सताचा दरबार आहे आणि तो ज्ञानासाठी मुक्त आहे.* *हे ज्ञानाचे आगर आहे.* आणि हे पुढील काळात बाबांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रवचने करून दाखवून दिले आहे.

ह्या दरबारात अनेक प्रकारची कर्तव्ये बाबांनी केलेली आहेत. त्यात ज्ञानोपासना करण्यापासून ते शुद्धीकरणे - वेगवेगळ्या पातळींची, स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहाची आणि त्या पलिकडची सुद्धा केलेली आहेत. सव्वीस अवतारांचे गुपितही ह्या कलियुगी स्थितीत उघड करून सांगितले आहे. सद्गुरूंचा महिमा पदोपदी उलगडवून सांगितला आहे, त्याशिवाय दाखवूनही दिलेला आहे. तो अगाध कसा आहे हे सोदाहरण दाखवून दिलेला आहे. अखंड चमत्कार काय व कसे असतात, तर त्यांच्यासमोर भुरटे चमत्कार कसे खुजे असतात हे ही भक्तगणांना येथेच या दरबारात दाखविलेले आहेत. किती किती म्हणून कर्तव्ये श्री सद्गुरू माऊलीने आपल्या या अवतारकार्यात या दरबारात प्रत्यक्षात घडवून घेतली होती, ती अवर्णनीयच होत.

शेवटी बाबा म्हणतात, *ज्याठिकाणी सत् आहे, तेथे शांती व स्थिरता आहे.* *याच भूमीवर पूर्वी सत् पदाचे स्थान होते.*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

नर (मनुष्य) देहानंतर

👏👏👏

नर (मनुष्य) देहानंतर पुन्हा देह नाही हे म्हणने तितकेसे बरोबर नाही. कारण मनुष्य देहामध्ये असतांना आपण जे कांही कर्तव्य करीत असतो त्याचा लेखाजोखा आपणच तयार करून ठेवित असतो, त्याचा हिशेब पुढिल देह कोणता मिळणार - (जसे चत्वार खाणी म्हणजेच जे कांही दृश्यमान आहे अर्थात डोळ्यांना दिसू शकते - तसेच त्या व्यतिरिक्त असणारे) - हे अवलंबून असते. त्यामुळे मानव देह मिळणार किंवा नाही? कां इतर कोणता देह मिळणार? हे सर्वस्वी आपल्या ह्या जन्मीच्या कृतीवर अवलंबून
असणारे असते आणि म्हणूनच म्हटले जाते "चांगले ते पेरा म्हणजे उगवेल तेही चांगलेच असेल" अर्थात चांगले काय आणि 
वाईट काय? हे आपण कसे ठरविणार? 
हे ठरविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. म्हणजेच
गुरूची आवश्यकता असते. हे गुरू पहिल्या प्रथम आपले माता-पिता असतात, जे
वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. तद्नंतर शाळेत जाऊ लागल्यावर शिक्षक हे आपले
गुरू होतात आणि मधल्या काळांत जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे समाजामध्ये
असणा-या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत जातो आणि ह्या कसोटीच्या
वेळी आपण आपल्या माता-पित्यांनी तसेच गुरूजणांनी दिलेले संस्कार पाठीमागे सोडून
नविन संस्कार धारण करण्यास सुरूवात करीत असतो. त्यात मग घरी दारी रोजची भांडणे
आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. गोष्टी विकोपाला जाण्याची वेळ येते आणि मग आपल्याला
गरज भीसते ती अध्यात्मिक, धार्मिक गोष्टींची. अशा वेळेस धाऊन येतात ते आपले गुरू,
जे फक्त गुरू न राहता सद्गुरू होतात. ह्या सर्वस्व चक्रातून बाहेर पडण्यास आपणांस
मदत करतात. आपल्याला राजमार्ग दाखवितात आणि आपला पुढिल कल्याणाचा,
मुक्ती मोक्षाचा मार्ग खुला करून देतात आणि हा राजमार्ग खुला झाला की आपण पुनरपी 
जननम पुनरपी मरणम आणि ते सुद्धा हक्काने मानव देह मिळवून त्या सताची सेवा
करण्यासाठी सज्ज होतो. परंतु हे देणे म्हणजेच मानव देह देणे की इतर चत्वार खाणीत ज्या
मध्ये किड्या मुंग्यापासून ते साध्या डोळ्यांना न दिसणा-या (जे आपण डिस्कवरीवर पाहतो)
जीव-जंतूपर्यंत असणा-या कोणत्याही देहांत फेकले जाऊ शकतो) हे सगळे त्या सद्गुरू
माऊलीच्या हातात असते. म्हणून नर देह पुन्हा प्राप्त होऊ शकतो हे सत्य होय.
वरील उहापोह हा आपल्या श्री सद्गुरूंच्या प्रवचनातील कांही अंश आहे. हे सर्वस्व
विचार जे योग्य आणि चांगले आहेत हे त्यांचे असून त्यामधील अनवधानाने कांही चुकीचे
असल्यास ते माझे आहेत. तरी त्याबद्दल कोणी चुकीचा अर्थ काढू नये इतकेच सांगणे.
श्री सद्गुरू माऊलींची क्षमा मागून हे इथेच आवरते घेतो.
धन्यवाद. 🙏🙏🙏

अवघाची संसार सुखाचा करीन

👏🙏👏

येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. 

*अवघाची संसार सुखाचा करीन*
*आनंदे भरीन तिन्ही लोक*
*जाईन गे माये तया पंढरपूरा*
*भेटेन माहेरा आपुलिया*
बाबांनी ह्या अगोदर संसार म्हणजे काय? हे सांगताना सांगितले आहेच की *संसार येणे नाम सगुणाचे सार*

*संत येणे स + अंत* जो कोणी सताचा येणे सद्गुरूंचा अंत लावण्या किंवा घेण्या गेला तो तेथेच शांत झाला. त्यांची *वाचा हे निमाली ते श्री गुरू* 

सद्गुरूंचा अंत कुणीच लावू शकत नाही, लावणे शक्य नाही, लावणारही नाही, जोपर्यंत ते आपली जाण देऊ इच्छित नाही.

प्रपंचाबद्दलही असे म्हणता येईल की, पर + पंच येणे नाम प्रपंच.

*अहं ब्रह्मास्मी* मीच ब्रह्म आहे. हे निर्विवाद सत्य होय. पण कोणासाठी? कोण म्हणू शकतो असे? तर बाबाच ह्याची फोड करताना सांगतात, *आपल्या रूपाचे, आपली दृष्टी बंद करून जर कां आपण दर्शन घेण्यात यशस्वी झालो, म्हणजेच तो भक्त आपल्या स्वरूपात जातो, त्यावेळीच तो ब्रह्म होतो.*

बाबा पुढे किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात, *आपल्या हृदयी जो अविनाशी आहे, त्याला ओळखले म्हणजेच संसार* *ज्यावेळी आपण आकाराची जाणीव घेऊ तेव्हाच निराकाराचा शोध लागेल.*

बाबा म्हणतात, *गरीब, श्रीमंत हे पूर्व संचित आहे* म्हणून भक्ती मार्गातील, त्यातही एकाच सद्गुरू माऊलींच्या सेवेक-यांमध्ये *गरीब, श्रीमंत* हा भेदभाव कुणी करू नये किंवा कुणी आणूही नये.

येथे *कृष्ण-सुदाम्याचे* उदाहरण बरेच काही सांगून जाते. ह्यापासून आपण बोध घेण्यास काहीच हरकत नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, *सगुणाचे सार घेतल्यावर *सत् + चित् + आनंद = सच्छिदानंद* लांब नाही. म्हणजेच सताच्या चित्तात अर्थात सद्गुरू माऊलींच्या चिंतनात, सद्गुरू माऊलींच्या आठवणीत किंवा स्मरणात म्हणा आपण आपला अमूल्य असा वेळ जर कां कारणीभूत लावला तर तो *सच्छिदानंद* आपणास दूर नाही.

हे आहे, ते सर्व परमेश्वराचे आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, ही जाण जर आपणास सदोदित असेल, तरच बाबा म्हणतात, *संसार सुखाचा होईल.*

*जी ज्योत मनाने सुस्वरूपी असेल तीच सद्गुरूंना पाहू शकेल.*

एकनाथ महाराज म्हणतात, *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल* जर आपण काया म्हणजे हे आपले पंचमहाभूतांचे शरीर हे जर कां पंढरपूर मानले, तर त्या शरीरात जो वास करून राहिलेला *आत्मा* आहे, तो म्हणजे विठ्ठल होय.* हे खरेच आहे, परंतु हा आत्मा रूपी विठ्ठल कोण? पंढरपूरात युगाने युगे उभा असलेला विठ्ठल की इतर कोणी?

 _तर तो हा विठ्ठल नव्हे. विठ्ठलांचा विठ्ठल जो आहे तो. तो कोण? तर ते म्हणजे ज्यांनी ह्या अगोदर 25 अवतार कार्ये नटविलीत ते, आपली श्री सद्गुरू माऊली, ज्यांनी ह्या कलियुगात 26 वे अवतार कार्य नुकतेच संपन्न केले, ते आपले बाबा._ 

बाबा म्हणतात, *तुकाराम* येणे *तुच का तो राम?*

बाबा पुढे म्हणतात, *ज्या ठिकाणी सत् आहे, त्या ठिकाणी भगवंत आहे.* आणि वेळ प्रसंगी अशा भक्ताचे संचितही ते स्थीर करतात. अशी कित्येक उदाहरणे बहुतेकानी *ह्याची देही, याची डोळा* प्रत्यक्षात अनुभवली आहेत.

शेवटी ती दयाघन श्री सद्गुरू माऊली समस्त भक्तगणांना आठवण करून देताना म्हणते, *जर भक्ती आपल्याकडून झाली नाही, तर जन्माला येऊन आपला उभा जन्म फुकट आहे.*

*तुम्ही या भवसागरी संसार करून, आणि करता करता तो तरून या भवसाग-याच्या पलीकडे चला.* _म्हणजेच त्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणी लीन होऊन, त्यांचे दर्शन मिळवून आयुष्याचे सार्थक साधा._

Friday, October 5, 2018

*मम तुजविण कोण...*

👏👏👏👏👏

*मम तुजविण कोण...*

करा एकचित्त अपुलेची मन
होऊ द्या सद्गुरूंचे नामस्मरण
अहंभाव जाऊ या विसरून
राग, लोभाचे होऊ द्या विस्मरण

एक असे नामाचे स्मरण
एक असे रागाचे विस्मरण
साधता दोन्ही एकची मन
लाभतील आपणास सद्गुरू चरण

सद्गुरूंचे लाभता चरण
मुक्ती मोक्ष चरणांत लिन
न दिसे या त्रिभुवनी कोण
आलो मी तुजशी शरण
सद्गुरू राया मम तुजविण कोण,
                  मम तुजविण कोण..
💐🙏💐👏💐🙏💐👏💐

*ॐ कार* म्हणजे काय?

👏👏👏

आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हणजेच बाबानी *ॐ कारांची* फोड करून सांगताना संपूर्ण विश्वाची माहिती आपणा सगळ्यांसमोर प्रगट केली आहे.

*ॐ कार* म्हणजे काय?
*ॐ कार* म्हणजे सर्व त्रिभुवन व्यापून असणारे तत्व. त्रिभुवन म्हणजे तीन भुवने !! *ॐ कार* हे आकारी आहे. *ॐ कार* हे अक्षर आहे. *अक्षर* म्हणजेच *पंचमहाभूतें* हि *पंचमहाभूतें* - आप (जल), तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी. 

(त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक. *[महाराष्ट्र राज्य शब्दकोश खंड चार]* )

आता महत्वाची गोष्ट ही की, *ओम* हे अक्षर *पूर्णत्व अक्षर* होत नाही व त्याचा उच्चारही करता येत नाही, जोपर्यंत त्यावर अर्ध चंद्राकृती कोर येत नाही, तसेच त्या अर्ध चंद्राकृती कोरीवर बिंदू जोडला जात नाही.

आता बाबा पुढे सांगतातच की, ही जी कोर आहे, ती कशाचे प्रतिक आहे? तर ती *मायाच* होय. या मायेमध्ये काय काय सामावलेले आहे? तर यामध्ये *आकार* आहे, *उकार* आहे आणि *मकार* देखील आहे.

हे *आकार, उकार, मकार* म्हणजेच क्रमाने *ब्रह्मा*, *विष्णू* आणि *महेश* होत.

जसे - *ब्रह्मा* मध्ये *आकार* आहे
*विष्णू* मध्ये *उकार* आहे तसे
*महेशा* मध्ये *मकार* आहेच.

पुढे बाबा म्हणतात, *पण त्यात बिंदू टाकल्यावर ॐ तयार झाला.* म्हणजेच बाबांच्या सांगण्यानुसार या पंचमहाभूतांमध्ये *माया* असून देखील उपयोगाची नाही, तर त्या ॐ ला पूर्णत्वता येण्यासाठी त्या अनंतांचा म्हणा, त्या परमेशाचा म्हणा तो बिंदू रूपी अंश टाकला गेला तरच तो ॐ कार पूर्ण होतो, पूर्णत्वास जातो.

(सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. *[विकिपीडिआ]*) हीच ती पंचमहाभूतें होत.)

ह्याचाच अर्थ असा की, "आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे, परंतु ते पूर्णत्व नाही. कारण ते माया रहीत आहे, त्याशिवाय त्यामध्ये तो बिंदू देखील नाही."

तर ते पूर्णत्वास कधी जाईल? तर ज्यावेळेस ते मायेने आपल्या ताब्यात घेतले जाऊन, त्यामध्ये अनंतांचा अंश म्हणजेच बिंदू प्रवेश घेईल, त्यावेळीच ते ख-या अर्थाने पूर्णत्व होईल.

या *ॐ* लाच, बाबा म्हणतात, *आम्ही समर्थ म्हणतो. तेच ते निर्गुण, निराकार."* हे निर्गुण, निराकार फक्त मानवासाठी आकार घेतात आणि येथेच न थांबता, ते मानवाना परम् गतीला घेऊन जातात. या मानवी देहाला ते इहलोक सोडून परलोकात देखील घेऊन जातात. अणू, रेणु, परमाणू आणि त्याच्याही पलीकडे ते घेऊन जाऊ शकतात. परंतु, त्यासाठी मानव सुद्धा त्या गतीचा, त्या पद्धतीचा, त्या पायरीचा पाहिजे. अशा भक्ताला कोणतीही उणीव पडणार नाही, असे ते स्वतः सांगतात.

पण हे सगळे मिळवण्यासाठी मानवाला सत् मार्गाने जाणे, हे त्याचे आद्य कर्तव्य आहे ह्याची जाणीवही करून देतात.

🙏💐🙏💐👏💐🙏💐🙏

सकाळच्या पारी

🙏🍀🌸🌷🌻🌺👏🍀🙏

सकाळच्या पारी
ऊभा क्षणभरी
तुझीया मी द्वारी
तुझा सेवेकरी

मागतो हे मागणे
सेवा मजला देणे
नाम तुझे घेणे
हे लागतो मी देणे

🙏🍀🌺🌻🌷🌸🍀👏🙏

*समर्थ तेच, तेच सद्गुरू*

👏🙏👏

आजच्या प्रवचनातील विशेष बाब म्हणजे - बाबा म्हणतात,
*समर्थ तेच, तेच सद्गुरू*
भुलू नका, चुकू नका. सर्व काही करणारे, तेच समर्थ !
पुढे बाबा असेही म्हणतात," *पण (समर्थ) मी त्यातला नाहीच म्हणणार.*" हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
पुढे बाबा म्हणतात, *समर्थ कसे असतात? तर स्थिर असतात.*

आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, *त्यांच्यात त्रिगुणात्मक नटविले, ते (त्रिगुण) - (समर्थ म्हणा, सद्गुरू म्हणा, किंवा अनंत म्हणा) हुकुमाशिवाय (या जगताचे कार्य) करीत नाही.*

आणि म्हणूनच बाबा म्हणतात, *करून अकर्ते असे ते सत् पद आहे.*

*हे नामस्मरण अत्यंत उच्च व श्रेष्ठ प्रतीचे आहे.* हे साधे आणि सुलभ देखील आहे. दुनियेच्या उचापती म्हणा, उठाठेवी म्हणा करण्यापेक्षा *नामस्मरण* करा.

बरे ते कसे करा, *तर एका तत्वावर दृढभाव ठेवून* म्हणजेच आपण आपल्या सद्गुरूंवर पुर्णत्वाने विश्वास ठेऊन, आपला जो मनामध्ये भाव आहे तो डळमळीत न ठेवता, अढळ भक्तीभावाने ते करा. इतकेच नव्हे तर *नामस्मरण* करताना आपल्या मायावी स्थितीचे विस्मरण होऊ द्या, मग ते घरदार का असेना?

*एका तत्वावर दृढभाव ठेवून, त्या गतीवर नामस्मरण करा.*

बाबा आपणा सर्वांस्वांना आठवण करून देताना म्हणतात, *आपण माया म्हणजे परब्रह्म मानतो.* परंतु हे खरे नाही. बाबा विचारणा करतात, *जर स्थूल आपले नाही,  तर माया आपली कशी म्हणावी?*

पण पुढे बाबा असेही म्हणतात, *माया रहीत तिन्ही जगाचा (स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक) स्वामी अर्थात भगवंतही नाही.* हे असे का म्हणतात बाबा? कारण, भगवंत म्हणा किंवा सत् म्हणा यांची जी माया आहे, ती माया कोणती? तर ती *सत माया*

बाबांनीच म्हटल्याप्रमाणे, माया ही दोन प्रकारची असते - एक म्हणजे *सत माया* आणि दुसरी *असत माया.* म्हणून सद्गुरूंची म्हणा, भगवंताची म्हणा जी माया असते, ती सत माया.

*माया* मग ती कोणतीही असो. ती सताच्या चरणांची दास आहे.

संत म्हणतात, *एक तत्व नाम, दृढ: धरी मना ।*

*नामस्मरण कोठेही करा* नामस्मरणाला स्थळकाळाचे बंधन नाही.

👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

वृत्ती शुद्ध असेल तर....

💐👏💐

वृत्ती शुद्ध असेल तर
मन स्थिर राहिल
वृत्ती निर्भीड असेल तर
मनावर ताबा राहिल
वृत्ती शुद्ध असेल तर
कानानेही शुद्ध ऐकाल
वृत्ती शुद्ध असेल तर
मन शुद्ध राहिल.

वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

मन सूक्ष्माला सोडून नाही आणि सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही. 

*वृत्ती त्रिकुटाच्या अधिन असते. वृत्ती शुद्ध असली तरच त्रिकुटी स्थिर राहते. त्रिकुटी स्थिर झाली तरच मन स्थिर होते आणि ज्यावेळेस मन स्थिर होते, तेव्हाच आपण आपल्या श्री सद्गुरू माऊलींना म्हणजेच भगवंताला पाहू शकतो.*

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

अनगडवाणी