Tuesday, August 20, 2019

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)
        
  *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल*
        *नांदतो केवळ पांडुरंग*

चोखोबा कोण होते? तर विठ्ठलाच्या देवळात झाडू मारणारे एक भक्त. 

विठ्ठलाला चोखोबा महार आहेत याचे सोयर सुतक नव्हते. विठ्ठल कोण होते? तर साक्षात भगवंत. भगवंताला जाती, पाती काहीही नसते, मग त्यांचा भक्त जातीने कुणी कां असेना? ह्या जाती-पाती कोणी निर्माण केल्यात? तर समस्त मानवानीच नां?

पण तोच चोखोबा म्हणतो, "काया हिच पंढरी आहे" आपली काया म्हणजे आपले शरीर अर्थात आपला हा पंचमहाभूतांचा देह, तर हिच पंढरी आहे. म्हणजेच पांडुरंगाचे स्थान असलेले ठिकाण आहे. अन् त्या देहाच्या पंढरीत हा विठ्ठलरुपी आत्मा आत विठेवर वास करीत आहे ह्याची आपले बाबा आपल्याला जाणीव करून देतात.

बाबा पुढे विचारणा करतात, "आम्ही पंढरपूर कोठे पहातो अन् आमच्या चोखोबाने पंढरपूर कोठे पाहिले? चोखोबा अडाणी असून त्याला हे कळले, मग तुम्ही सांगा, अडाणी श्रेष्ठ कि सुशिक्षित श्रेष्ठ! 

परम् श्रेष्ठ आपल्या बाबांनी म्हटलेलेच आहे, तसेच 
संतानी देखील सांगितलेलेच आहे, *जेथे मांडीले ढोंग, तेथे कैचा आला पांडुरंग* म्हणजेच जेथे ढोंगच ढोंग मांडलेले आहे, अशा ठिकाणी पांडुरंग कसा बरे येईल?

म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, "ज्या ठिकाणी ढोंग आहे तेथे पांडुरंग कसा बरे येईल आणि कुठून येईल? 

*पांडुरंग म्हणजे शुभ्र प्रकाश, पांडुरंग म्हणजे भगवंत !* अशा ठिकाणी तो तेथे स्थिर राहू शकेल का?* 

तो जर स्थिर रहावयाचा असेल, तर त्याकरीता आपली सद्गुरू माऊली म्हणते, "भक्ताने ढोंग रहित होणे गरजेचे आहे. सतशुध्द गतीने वाटचाल करने गरजेचे आहे. मगच तो स्वप्रकाश पहाता येईल. 

त्याकरीता परम् पूज्य श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सेवेक-यानों, मायारहित व्हा, शुद्ध व्हा. सर्वस्व जीवन हे त्यांचेच (म्हणजे सताचे) आहे."*

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आपण केवळ निमित्त (मात्र) आहोत. या मृत्युगोलार्धात, जन्म घेणे अन् अदृष्य होणे हा सिद्धांत आहे. सतयुगापासूनचे ऋषी-मुनीं आजदेखील सानिध्यात आहेत. ते आपल्या (अध्यात्मिक) शक्तिच्या जोरावर अदृष्यही होऊ शकतात.

म्हणून पुढे बाबा म्हणतात, *"ही शक्ति तुम्ही सुद्धा कमाऊ शकता, पण केव्हा तर स्वप्रकाश मिळेल तेंव्हा."* 

*स्वप्रकाश मिळाला नाही तर तुम्ही काही करु शकणार नाही. मग पुनरपी जननम्, पुनरपी मरणम्!* 

चौर्याऐशी लक्ष योनी तुमची वाट पहातच असते. मानव योनीचा फेरा चुकला अन् उरलेल्या त्र्याऐशी लक्ष योनीत जर तुम्ही भटकत राहिलात, मग तुम्ही सत् सानिध्यात कधी येणार? अशी विचारणा आपले बाबा आपणांस करतात.

आणि पुढे जाणीव करून देताना म्हणतात, *हक्काने मानव जन्म मिळाल्याखेरीज सद्गुरु सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.* 
(14)  क्रमश:

अनगडवाणी