Thursday, January 16, 2020

बदलापूरायन

बदलापूर - एक सेंट्रल रेल्वेवरील कर्जतच्या दिशेने असणारे सर्वसामान्य रेल्वे स्टेशन. हे ठाणे जिल्ह्यात असून ह्याचे सर्वसाधारण क्षेत्रफळ अंदाजे ३५.६८ स्के.मी. इतके आहे. 

येथे आल्यावर पाहण्यासाठी जवळपास उपलब्ध असणारी ठिकाणे म्हणजे कोंडेश्वर मंदिर, मलंगगड, चिखलोली (अंबरनाथ) आणि बारवी धरण, माहुली शिखर, कोंडेश्वर तलाव, चंदेरी किल्ला, विस्परींग पिपल रिसाॅर्ट, धनगर धबधबा इत्यादी इत्यादी.

आम्ही येथे आलो कारण आमचे एक मित्र आणि सत्संग परिवारातील स्नेही चंद्रकांत येवले यांच्या आग्रहाखातर, जे गेल्या काही वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. 

येथे उतरल्यावर मुंबईच्या उपनगरीय स्टेशनांसारखेच हे छोटेखानी स्टेशन असून, बाजूलाच भलामोठा स्कायवाॅक बांधलेला दिसून येतो. ह्याचे नांव हेनरेपाडा फुट ओवरब्रीज असून, तो बाजूच्याच सर्वोदय नगर एरियाचा भाग आहे.

आमच्या यजमानांनी आमची चोख व्यवस्था अगोदरपासूनच करुन ठेवलेली होती. त्यामुळे जसे आम्ही स्टेशनवर उतरलो, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत करुन पलीकडे उभ्या करून ठेवलेल्या इको ह्या मोठ्या टॅक्सीत नेऊन बसविले. 

जाता जाताच यजमानांनी आम्हांस कल्पना दिलेली होती की आपणांस बदलापूरच्या एका प्रसिध्द वडेपाववाल्याकडे *मुळगांवचा वडापाव* जायचे आहे आणि तेथून पुढे मग डॅमवर (धरणावर) जावयाचे आहे.

दहा-पंधरा मिनिटांत आम्ही आमच्या संकेतस्थळावर पोहोचलो देखील. बाहेरच ब-याचशा गाड्या पार्क केलेल्या लांबूनच दिसून येत होत्या, त्यामुळे क्षणभर असे वाटून गेले की आपला नंबर लवकर काही लागणार नाही. परंतू घडले विपरीत. जसे आम्ही गाडीतून उतरून बाहेर पडलो, तेव्हाच कळले की आज म्हणावी तेवढी गर्दी नसल्याने, आम्हांला लवकरच एकत्र बसण्याची जागा उपलब्ध होणार आणि झालेही तसेच.

झाले. ताबडतोब आॅर्डर दिली गेली आणि कांहीं वेळातच गरमागरम मुळगांवचा फेमस वडापाव आमच्या टेबलांवर हजर झाला. प्रथमतःच कागदाच्या प्लेटवरील वडापाव पाहून मन समाधानी पावते न पावते तोच बाजूलाच प्लेटवर मिरचीच्या हिरव्यागार रंगाची ठेच्याची चटणी पाहून गर्भगळीत व्हावयास झाले. त्या ठेच्यातून हिरवट पिवळ्या रंगाचा तेलाचा पाट वाहताना पाहून वाटले, आता आपले काही खरे नाही.

परंतु, गंमत अशी की दृश्य जेवढे भयानक वाटत होते, तेवढे ते प्रत्यक्षात नव्हते. जरी हा हिरव्यागार मिरचीचा ठेचा होता, तरी तो आपल्या नावाला न जागणाराच होता आणि म्हणूनच की काय थोड्या वेळाने पाहतो तर ठेचा प्लेटवरून गायब झालेला होता आणि फक्त हिरवा पिवळा तेलाचा ओघळ तेवढा प्लेटवर शिल्लक राहिलेला होता.

अशाप्रकारे सकाळच्या नाश्त्यावर येथेच्छ ताव मारुन आमची पलटण पुढच्या प्रवासाला निघाली. झाले. थोड्याच वेळात आम्ही डॅमच्या एका कोपरावर आलो. दुर्दैव असे की धरण पाहण्यासाठी यावेळी रितसर परवानगी देण्यात आलेली नसल्याने सर्वचजण नाराज झालेले होते. कारण डॅमवर सैरसपाटा मारण्यास यावेळी मिळणार नसल्याने पुढील कार्यक्रमाचे आता काय करायचे अशा विचारात असतानाच, आमच्या सोबत आलेले, तेथीलच एक ग्रामस्थ श्री रवी यांनी एक उपाय सुचविला. म्हणाले, आपण धरणाच्या खालील भागात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाखाली जाऊया. थोडा वेळ पाण्यात पाय भिजवूया. 

ठरले. आयडियाची कल्पना सगळ्यांनाच आवडली. खाली उतरण्यासाठी असलेला रस्ता शोधू लागलो आणि शिवाजी महाराजांचा काळ आठवला. किल्ल्यावर जाताना जसा एकपदरी दगडाधोंड्यांचा रस्ता असायचा, बाजूलाच खोल दरी असायची, तसा हा रस्ता भासला. रस्ता कसला? हि तर पायवाटच होती. होय नाय होय नाय करीतच आम्ही शेवटी खाली उतरण्यात यशस्वी झालोच.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही भेट दिलेली ही वेळ येथे येण्याची नक्कीच नव्हती. त्यामुळे येथे जे दृश्य दिसत होते ते म्हणजे सर्वत्र पसरलेला काळा कातळ. काही ठिकाणी निसर्गानेच निर्माण केलेले पाण्याचे डोह. काही खोल, तर काही उथळ. पुलावरून पाणी वाहून जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हा काही पावसाळी हंगाम नव्हता, ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत असतात. 

खाली उतरतानाच रवी भाऊंनी कल्पना दिलेली होती की जो दूरचा डोह आहे, तेथे मात्र कुणी जाऊ नका, कारण तो एक अॅक्सिडंट स्पाॅट आहे. तेथे जाणे म्हणजे जाणूनबुजून आपण अपघात अंगावर ओढून घेतल्यासारखे होईल. तेथे पावसाळ्यात हमखास अपघात घडून येत असतात. कारण पावसाळ्यात पाण्याच्या खोलीची कल्पना नव्याने येणाऱ्या पर्यटकांना येत नाही आणि त्यामुळें नाहकच अपघात घडून जीवावर बेतण्याचे प्रसंग सुद्धा उद्भवतात.

थोड्या गमंती जमती करून, मनोरंजनात्मक कार्यक्रम करून पोटात कावळे ओरडायला लागल्याने आम्ही तेथून काढता पाय घेतला. रवी भाऊंच्या घरी अगोदरच जेवणाची सोय करून ठेवण्यात आलेली असल्यामुळे सगळ्यांचे पाय आपसूकच तिकडे वळले. जेवणाचा बेत हा घरगुतीच असल्याने कित्येक दिवसांनी गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळणार असल्याने पाहुणे मंडळी खूप खुष होती. दोन्ही प्रकार - वेज, नाॅनवेज उपलब्ध होते. नाॅनवेजमध्ये गावठीचा बेत होता, तर वेजमध्ये वरण भात, उसळ, चुलीवरची ताजी ताजी तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंडळींनी येथेच्छ मन सोडून भोजन केले, ते यजमानांचे गुणगान गातच. किती दिवसांत असे गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळाले नव्हते आणि मिळणारही नव्हते. याचे अप्रुप काही वेगळेच होते.

तेथेच कांहींनी आराम केल्यावर, पुढे कोंडेश्वर मंदिरास भेट देण्याचे ठरले. हे ठिकाणही एका बाजूला असून, तेथे आजूबाजूला डोंगर, डोह, कातळ, आणि जंगलच असल्याचे जाणवले. हा ही एक निर्जन भागच आहे. जुने शिवाचे मंदिर असून, बाजूलाच डोह देखील आहे. येथील डोहात देखील पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे अपघात घडत असतात. त्यामुळे हा ही भाग तसा सुरक्षित नाहीयय. परिसरात ह्यावेळी तरी स्वच्छता पाहावयास मिळाली. मुख्य कमानीपासून बरेच आत हे मंदिर छोटेखानीच आहे. येथे लिंग स्थापिलेले असून, गाभाऱ्यात मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुललेले असावे, हे आजूबाजूचा प्रदेश डोळ्याखालून घालताच जाणवते. श्री शंकराचे हे स्थान असल्यामुळे येथे जाणवणारी शांतता देखील भयाण असल्याचे जाणवते. माणसांचा वावर येथे दिसून येत नसल्याने, ती प्रकर्षाने जाणवली असावी इतकेच.

तेथून पुढे परतीचा प्रवास आटोपून आम्ही बदलापूर स्टेशन कधी गाठले हे कळलेच नाही.

Friday, December 13, 2019

स्वत:शी प्रामाणिक रहा

एक ओळ कुठे तरी वाचल्याची जाणवले. ती ओळ होती, *स्वत:शी प्रामाणिक रहा*. 

खरे आहे, माणसाने स्वत:शी प्रामाणिक राहिले पाहिजे. पण म्हणून इतरांशी अप्रामाणिकपणा करावा कां? तर याचे उत्तर नाही म्हणूनच यावे, असे अस्मादिकांस वाटते. काही अंशी हे सत्यवचन, काही अंशी असत्य वचन असू शकते. परंतु स्वत:शी प्रामाणिक राहता राहता तोच प्रामाणिकपणा इतरांशीही वागताना ठेवला तर मग सोन्याहून पिवळे नाही कां होणार?

परंतु स्वत:शी प्रामाणिक राहून इतरांशी वागतांना आपणांकडून इतरांवर अन्याय तर आपण करीत नाही नां? याचेही अवधान आपण बाळगावयास नको कां? 

स्वत:शी प्रामाणिक राहणे म्हणजे काय करने? इतरांशी अप्रामाणिक वागणे की काय? 

प्रामाणिक म्हणून आपलेच घोडे दामटणे हे कितपत योग्य? हे ज्याचे त्यानेच ठरवायचं आहे. मी प्रामाणिक, मला सर्व समजते, मी स्वघोषित तज्ञ, इतरांना ह्यांतील काय कळते?, कळते ते मलाच कळते अशा भ्रामक विश्वात राहून इतरांना तुच्छ लेखणे व त्यामुळे त्यांना खिजगणतीतही न घेणे, त्यांना न कळविता आपल्या कंपूत रममाण होऊन आपल्या कंपूशी प्रामाणिक राहणे हे कोणते लक्षण समजायचे?

आपण हे लक्षात घेणे गरजेचे आहे की मी कुणी एकटाच नाही आहे, ज्याला भगवंताने सर्वस्व बहाल केलेले आहे, तर इतरेजणही आहेत, जी त्या भगवंताचीच लेकरे आहेत. तर यांच्याशीही मी प्रामाणिक राहणे तेवढेच गरजेचे आहे, जेवढे मी माझ्याशी प्रामाणिक राहतो.

*_मी माझ्याशी प्रामाणिक राहणे हा माझा दागिना जरी असला,_* तरी इतरांशी देखील मी प्रामाणिक राहून प्रामाणिकपणे माझे कर्तव्य कर्म करणे हे कांही कथिलाचे लक्षण नव्हे. हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे देखील आहे.

प्रामाणिकपणाच्या आड आडोसा घेऊन समाजातील इतरांशी अप्रामाणिकपणा अवलंबिणे हे काही यथायोग्य नाही.

सद्गुरू आणि अनंत


Sunday, December 8, 2019

साक्षात्कार

भाषा नच ती वैरीणी,
जिव्हा नाचे ती स्वैरीणी,
साधू संत न पाहूनी,
बोले ती अद्वातद्वा......

ऐसा उफराटा तो जीव,
शब्दांमधूनी बडेजाव,
साधूशी बोले अवास्तव,
शिपाई तो साधासुधा.......

साधू महाराज मात्र,
ओळखती कोणते पात्र,
कोण असतील अपात्र,
जया अंगी लिनता, नम्रता......

साधू ओळखे राजा श्रेष्ठ,
ज्याच्या भाषेने न होती कष्ट,
न वागे तो कनिष्ठ,
ऐसा तो प्रजापती राजा......

संकट समयी सहनशीलता,
समृध्दी समयी विनम्रता,
तयाने कोंडीले अनंता,
ऐसे वदती तुकाराम......

मानवामध्ये सहृदयता,
मानवामध्ये कृतज्ञता,
मानवामध्ये मानवता,
त्यालाच भेटे अनंत......

अनगड म्हणे हे देवा,
कधी भेटवीशी केशवा,
नाम घेता तुझे बरवा,
साक्षात्कार घडो हे माधवा......

Friday, November 22, 2019

कोहम्-भाग दोन

🙏🙏🙏

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज परिवार*

*कोहम्! मी कोण आहे?*

*तसे पाहिले तर मी कोणीही नाही. मी एक पंचमहाभूतांचा पुतळा होय.*

(*पंचमहाभूते म्हणजे काय?*
*पंचमहाभूतें म्हणजे आप (पाणी अथवा जल), तेज (अग्नी), वायु, आकाश आणि पृथ्वी ही पांच तत्वें होत.* या पांच तत्वांनी सजीव सृष्टी निर्माण झाली असे म्हणतात.

तसेच सांख्यदर्शन शास्त्रानुसार सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात.)

जर मी कोणीही नाही, पंचमहाभूतांचा एक पुतळा आहे, मग मी, "मी मी" असे कां बरे म्हणत असतो? मीपणा माझ्या मध्ये कां बरे येत असतो? कां बरे मी माझ्यातील परमात्म्याला विसरतो?

कुणी विचारतील, बरे, आता हा परमात्मा कोण? तो कुठे असतो? तो कोठे वास करतो? तो कुठे राहतो?

*परम् + आत्मा* येणे नाम परमात्मा. ही दोन शब्दांची व्याकरणातील संधी होय.

*प्रथम *आत्मा* म्हणजे काय? हे समजून घेऊ. 

आपल्या आत असणारी *मा* म्हणजे ज्योत, म्हणजेच त्या परमेशाचा अंश, ज्यावेळी आईच्या गर्भात हा पंचमहाभूतांचा पुतळा आकार घेत असतो, त्यावेळी तीन-चार मासाच्या कालावधीनंतर किंवा अवधीनंतर, त्यामध्ये हा अंश कधीतरी प्रवेश करता होतो आणि तद्नंतरच त्या मातेच्या गर्भामध्ये हालचाल, चलन-वलन होण्यास सुरुवात होत असते. याचाच अर्थ असा की तो पंचमहाभूतांचा पुतळा, हा पुतळा न राहता, त्यात सजीवता येते. अन्यथा तो एक मांसाचा गोळाच बनून राहतो, ज्याला अचेतन किंवा निर्जीव देह म्हणतात, ज्यामध्ये हालचाल दिसून येत नाही. ह्याउलट सजीव म्हणजेच जीवा सहीत किंवा चेतन देह असून, त्यामध्ये हालचाल दिसून येते.

परम् ह्याचा अर्थ अंतिम, सर्वोत्कृष्ट, मुख्य, उच्च इत्यादी, म्हणजेच आपल्या आत वास करून असणारी मा, येणे आत्मा हा त्या अंतिमाशी, मुख्याशी, उच्चाशी एकलय होतो, एकजीव होतो त्यावेळेस तो *परमात्मा* ह्या नावाने ओळखला जातो.

म्हणून त्या परमात्म्याला आपण कधी विसरायचे नसते. आपण जर त्या परमात्म्याला विसरलो नाही तर तो ही आपल्याला विसरणार नाही आणि ही सर्वस्वाची जाण ठेवून जर आपण वागलो तर आपल्यामध्ये मी पणा कधीच येणार नाही आणि मी पणाच जर आपल्यात आला नाही, तर तुझे माझे होणार नाही आणि त्यामुळें आपणांस आपल्या भगवंताच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा होईल. 

मी मी राहणारच नसल्याने तो भगवत भक्त परमेश्वरात एकलय होऊन जाईल. त्या परमात्म्याशी तादाम्य होईल. द्वैत भावना नाहीशी होऊन, तेथे अद्वैत भावना येईल. अशावेळेस *कोहम्* म्हणजेच मी कोण हा प्रश्नच उपस्थित होणार नाही.

अनगड म्हणे, *कोहम्* कोहम् न राहता, तो *ओहम्* ओहम् येणे *ओंकार*मय होईल.

ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.@विकीपिडीया...अनगड

हे वर्ण संपूर्ण ब्रम्हांडात विहार करून त्यांचा संयोग झाला. हा संयोग म्हणजेच ओम् कार होय. या सृष्टीचे पालक ब्रह्मा, विष्णु व महेश हे अनुक्रमे अ ,उ आणि म् यांचे प्रतिनिधित्व करतात.@विकीपिडीया...अनगड

👏💐👏💐👏💐👏💐👏💐👏

Thursday, November 21, 2019

कोहम्

*मी* 
*कोहम्?*
*मी कोण आहे?*
*कुणालाच माहीत नाही, मी कोण आहे?*
*कुठून आलो आणि कुठे जाणार?*
*हो, हो ! चुकलेच की माझे.* *असे म्हणावयास नको होते.*
*प्रत्येक मानवाला माहीत असते की आपला जन्म आईच्या गर्भातून झाला आहे आणि हे ही माहित असते की एके दिवशी हे नश्वर जग सोडून आपल्याला पैलतीरी जावयाचे आहे.*
*हो !* *पण हा पैलतीर कोणता?*
*हा पैलतीर म्हणजे नदीचा पलिकडील काठ की काय?*
*येड गांवहून पेड गांवला चाललात की हो राव !*
*अहो, हा तो पैलतीर नव्हे.*
*तर, आपल्याला गाठावयाचा आहे तो पैलतीर म्हणजे त्या भगवंताचे चरण !*
*कुणीतरी म्हणेल, स्वर्ग, तर कुणी म्हणेल, कैलास*
*येथे ही पुन्हा दोन तट, दोन दिशा*
*कुणी असे विष्णूंचे भक्त, तर कुणी शिवाचे भक्त.*
*येथे ही पुन्हा "मी"पणाच* 
*मग सांगा, पैलतीर कोणता बरे?*
*तर आपल्याला गाठावयाचा आहे तो पैलतीर म्हणजे अपुल्या भगवंताचे चरण.*
*चरणातच सगळे सामावलेले आहे आणि ते चरण आहेत अपुल्या सद्गुरुंचे. आपले सद्गुरू म्हणजेच अपुले भगवंत.* 
*हे अपुल्या सद्गुरुंचे चरण म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष होय.*
*म्हणूनच म्हटले आहे, ज्याला सद्गुरू सापडले, त्याला मुक्ती ही सापडली आणि मोक्षही सापडला.*
*ज्याला मुक्ती आणि मोक्ष सापडला, त्याला भय कसले? त्याला काय कमी आहे?*
*कारण ज्याचा सखा पांडुरंग, त्याला कशाची चिंता?*
*म्हणूनच म्हटले आहे, "ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्र्व कृपा करी."*
*सारे विश्वच काय, तर साक्षात श्रीहरी देखील कृपा करी*
*आणि श्रीहरीची कृपा होणे म्हणजेच त्यांचे चरण आपणांसी मिळणे होय.*
*चरण मिळणे, म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष प्राप्त होणे होय.* *म्हणजेच पैलतीर गाठणे होय.*
*पैलतीर गाठला असता, अशा भक्ताला काय उणे?*
*मग, लागणार ना पैलतीर गाठायच्या मार्गाला?*
*चला तर मग.*......*_अनगड_*

Friday, November 15, 2019

नामातच सर्वस्व बहरलेले आहे.

*_नामातच सर्वस्व बहरलेले आहे._* 

हो, हे जरी खरे असले, तरी ते नाम कुणाचे? ते तुमचे की आमचे? ह्याबाबत मात्र संभ्रम निर्माण होऊ नये हे तितकेच खरे. तर हे नाम, आपण आपल्या भगवंताचे, आपल्या सद्गुरुंचे, त्या जगत् नियंत्याचे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे त्या राघवाचे, त्या रामाचे घ्यावे.

*_नाम घेता मुखी राघवाचे_*
*_दास रामाचा हनुमंत नाचे_*
*_हो, दास रामाचा हनुमंत नाचे_*

बरे, ते कसे घ्यावे? तर त्या रामाच्या दासाने म्हटल्याप्रमाणे म्हणजेच हनुमंताने म्हटल्याप्रमाणे, *"दास रामाचा हनुमंत नाचे"*. 

नाम घेता घेता आपण त्या नामात इतके तल्लीन व्हावयास हवे, इतके त्यात गुंतून जावयास हवे की आपणांस सर्वस्वाचा विसर पडावयास हवा. आजूबाजूच्या कसल्याच गोष्टींचे स्मरण व्हावयास नको. त्या नामात आपण दंग व्हावयास हवे. आपण त्या नामात दंग होऊन, त्या रामभक्त हनुमंता सारखे एकलय होऊन नाचावयास हवे. 

याचाच भावार्थ असा की आपण त्या *रामाचा दास* असलेल्या हनुमंता सारखे *_राममय_* व्हावयास हवे. असे ज्यावेळी आपण होऊ, त्याचवेळेस तो पांडुरंग आपणांस आपल्यात सामावून घेऊन आपल्याला दाखवून देईल की हे बघ, मी कसा तुझ्यातच सामावलेला आहे. हा बघ, पांडुरंग कसा शुभ्र पांढ-या रंगात रंगलेला आहे. पांढरा रंग हा सताचा रंग.

यावरून रामभक्त श्री हनुमानाचे ते चित्र आठवले, ज्यामध्ये हनुमंत आपली छाती आपल्या दोन्ही हातांनी फाडून दाखवित आहे व आतमध्ये श्री राम प्रगट होऊन दर्शन देताहेत.

येथे जी छाती फाडून दाखविण्यात आलेली आहे, ती तशी स्थिती नसून, त्यामधून सांकेतिकपणे हे दाखवून द्यावयाचे आहे की ज्यावेळेस एखादा भक्त त्या हनुमंतासारखा संपूर्णपणे राममय होईल, त्या रामनामात दंग होईल, त्यावेळेसच प्रभू राम त्या भक्तावर प्रसन्न होऊन, त्याला त्याच्या आंतरीक स्थितीत, हृदयस्थ स्थितीत, त्याच्या समाधी स्थितीत त्याला दर्शन देतील.

*_अनगड म्हणे हे रामा_*
*_दर्शन मज द्यावे हे मनोरमा_*
*_रुप तुझे मज हृदयी पाहूनी_*
*_तृप्तता येऊ दे माझ्या मनोमनी_*
*_दंग होऊनी जाऊ दे हे सीतारामा सकळा_*
*_तुझ्याच नामाचा लागू दे मजला अवघाची लळा_*
*_हृदयस्थ कोरून ठेवू दे मजला तुझीच मूर्ती_*
*_जन मनात वाढू दे अशीच तुझी दिगंत कीर्ती_*
*_दास रामाचा हनुमंत जसा नाचे_*
*_अनगड अपुल्या मुखी तुझेच नाम वाचे_*
*_तुझेच नाम वाचे, तुझेच नाम वाचे_*

Sunday, October 6, 2019

नावात काय आहे?

अनगड आणि आनंद. या दोहोंचा संधी होताच "अडगडानंद" होतो. तसाच संगम भक्त आणि भगवंताचा, भगवंताच्या नामानेच होतो. भक्त जेव्हा "नामस्मरणात दंग होऊन जातो, एकलय होऊन जातो", त्याचवेळेस भगवान त्या भक्ताला आपल्या जवळ घेतात आणि आपले दर्शन देतात आणि म्हणतात, "बाळा, बघ ! मी कसा ह्या त्रिभूवनात भरून राहिलो आहे ! बघ, मी ह्या त्रिभूवनात भरून राहिलेला असून देखील अलिप्त सुद्धा आहे."

अवघा आनंदीआनंद जहाला की अनगड काय किंवा अनगडानंद काय? एकूण सगळे सारखेच की. सारेची त्या माऊली पुढे नतमस्तकच असतात. 

अनंताचा तो "आ" आणि नंदाचाही "आ" च. म्हणजेच अनंत येणे "निराकार" आणि नंद म्हणजे "आकार", येणे नाम सगुण आणि निर्गुण. ज्यावेळेस "निराकार" "आकार" घेतात, त्याचवेळेस ते मानवी त-हेने अपुल्या चर्मचक्षूंना दिसून येत असतात. अन्यथा आपण त्यांना फक्त "नामस्मरणाच्या" गतीने गेल्यासच समाधी अंगाने पाहू शकू.

ज्या ज्या वेळी भूतलावर भगवंताची आवश्यकता असते, त्या त्या वेळी "निर्गुण" हे अवतारकार्य धारण करून म्हणजेच अवतार घेऊन पृथ्वीतलावर अवतीर्ण होत असतात. याचाच अर्थ असा की "निर्गुण" "सगुण" रुपाने अवतरीत होऊन मानवी त-हेने अपुला कार्यभार सांभाळीत असतात, परंतु आपली जाण मात्र कुणालाच देत नाहीत.

ह्या दोघांचाही जेव्हा कृपाशीर्वाद मिळतो, तोची आनंदाने प्रगट होतो, तेथे मग द्वैत भावना न राहता अवघा आनंदीआनंद भाव तेवढा उरतो. 

शेवटी मानवी त-हेने कोणीतरी म्हटलेले आहेच की नावांत काय आहे? नांव महत्त्वाचे नसून, एखाद्याचे काम अर्थात कार्य महत्त्वाचे असते. कर्तव्य महत्त्वाचे असते.

संतांनी तर त्याहीपुढे जाऊन सांगितले आहे की "ते नाम सोपे रे"....... म्हणून मानवी नावाला महत्त्व न देता आपण अज्ञ बालकांनी आपल्या सद्गुरू नामावर भर देऊन, त्यांचे नामस्मरण करने हितकारक ठरावे.

अनगडाला आनंद झाला, म्हणूनी तोची अनगडानंद जहाला. बाकी मानवी त-हेने बघितले तर नावांत काय आहे? 

याउलट अध्यात्म्याच्या दृष्टीने पाहता, नामातच सगळे भरलेले असून, आपल्या भगवंताच्या चरणांप्रत पोहचण्यासाठी नामस्मरण करने अत्यंत आवश्यक आणि गरजेचे देखील आहे.

अनगड म्हणे,  
         "हे देवा, काय करू मी तूझीच सेवा
                   नित्य निरंतर मजला अपुल्या जवळ ठेवा
          "अपुला कधी विसर न होऊ द्यावा
                    हीच विनवणी करीतो मी देवा 
                    (आपुलिया चरणी) !!!

Sunday, September 8, 2019

प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*वेदा पडीले मौन शास्त्रे वेडावली |*
*वाचाही निमाली ते श्रीगुरु ||*

         एकनाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंवर हा अभंग रचलेला आहे. एकनाथ महाराजांचे सद्गुरु जनार्दन स्वामी हे होते. जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना अनुग्रहीत केले होते. एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामींचे सर्वस्व महत्व जाणले होते. त्यांची महती एकनाथ महाराजांनी गाताना, त्या महतीमध्ये त्यांनी सांगितले आहे, 

*वेदा पडीले मौन, शास्त्रे वेडावली*
*वाचाही निमाली, ते श्रीगुरु*

एकनाथ महाराज म्हणतात, "त्या माझ्या सद्गुरूंची महती काय वर्णावी? त्यांची महती गाता गाता *वेद देखील मौनावले, अन् वाचा देखील निमाली. अर्थात वाचा देखील बंद पडली. इतकेच नव्हे, तर जी कांही शास्त्रें आहेत, ती सुद्धा, त्यांची महती गाता गाता, गुणगान गाता गाता वेडावली*, असे ते माझे सद्गुरू आहेत. अशा जाणीवेने जेव्हा एखादा भक्त आपल्या सद्गुरूंचे नामस्मरण करतो, त्यावेळेसच ते सद्गुरु प्रगट होतात, असे आपले बाबा आपल्याला सांगताहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *वेद म्हणजे ध्वनी, येणे नाम!* ते देखिल लहरीत लयबद्ध होऊन जातात. मन देखील लहरीत लयबद्ध होऊन जाते. अशावेळेस तेथे शास्त्र तरी काय करणार?* 

शास्त्र या ठिकाणी टिकूच शकत नाही. *अखंड नाम देखील त्याठिकाणी लय होऊन जाते.* तेथे काहीच शिल्लक रहात नाही. शास्त्रांना त्या सद्गुरूंचा अंतच लागणार नाही आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगतात, *हे सर्वस्व जाणण्याचा पलीकडे आहे. म्हणजेच जाणीवेच्या पलिकडचे आहे.*

ज्यावेळेस आपण आपल्या सद्गुरू माऊलींचे नामस्मरण करता करता आपले देहभान विसरू व त्यांच्यांच नामात तल्लिन होऊ, त्यांच्या स्मरणात रममाण होऊ, त्यांची छबी आपल्या मनात पाहू, त्याचवेळेस आपण ख-या अर्थाने त्यांच्याशी एकरुप होऊन, बाबा म्हणतात त्याप्रमाणे, जाणीवेच्या पलीकडे जाऊन त्या सताशी तादाम्य होऊ शकू. अशी स्थिती झाली असता, काय उरते? तर फक्त पंचमहाभूतांचा देह. *अशा व्यक्तीला ना कशाची जाण असते, ना कशाचे भान असते.* ही एक समाधी स्थिती असते. त्या आनंद ब्रह्मांत ती ज्योत लय झालेली असते.

ऋग्वेदात स्पष्ट म्हटले आहे की *सताचा कोणी अंत लाऊ शकत नाही.* मग तिथे शास्त्रांचा काय पाड लागणारआहे?

बाबा आपणांस समजावून सांगताना म्हणतात, "शास्त्रे वेडावली म्हणजे शास्त्रांना पुढे जाता आले नाही. त्यांना संताचा अंत घेता आला नाही."

श्री सद्गुरू माऊली पुढे *गुह्य उघड करतांना* म्हणते, *अखंड नामाच्या (सतपदाच्या आसनावरून साक्षात सताने दिलेले नाम - फक्त तेच गुरू गुह्य आहे, इतर सताच्या ठिकाणी काहीही गुह्य नव्हते आणि नाही) गतीत गुंग होऊन गेल्यानंतर, जो बाहेर पडणारा प्रणव आहे, बोल आहे तो म्हणजे ॐकार ध्वनी होय.* 

अशाप्रकारे नामस्मरण करत करत जेव्हा भक्त किंवा सेवेकरी जाणीवेच्या, नेणीवेच्या पलीकडे जातो, त्यावेळेस बाबा म्हणतात, नामाची स्थिती बंद होत जाते. त्या भक्ताची स्थिती कशी होते? तर जाणीव रहित स्थिती होते. जाणीव अजिबात रहात नाही. आणि मग अशावेळेस स्वयंम् गुरुतत्व प्रगट होते, अर्थात जो भक्त ज्या सद्गुरूंचे ध्यान करणार तेच सद्गुरु त्याच स्वरुपात प्रगट होतात. अर्थात त्या भक्ताला आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते. ह्या स्थितीला भक्तीमध्ये मुक्ती आणि मोक्ष म्हटलेले आहे. मुक्ती आणि मोक्ष इतर दुसरा तिसरा नसून, हाच मुक्ती आणि मोक्ष होय.
(1) क्रमश:

Friday, August 30, 2019

गुरुराज स्वामी ......

  *प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
                      *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)

बाबा म्हणतात, "काही ज्योती त्याला प्रकाश हवा म्हणून, ते सताचे ध्यान करीत नाहीत, तर त्याला जीवाची भिती वाटते म्हणून ध्यान करतात." 

बाबा असे कां बरे म्हणत असतील?
आता आपण प्रकाश येणे कोणती स्थिती आणि ध्यान येणे कोणती स्थिती? ह्याबद्दल समजून घेऊ. बाबांना अभिप्रेत असलेला प्रकाश म्हणजे *सताचा शुभ्र प्रकाश.* प्रकाश निरनिराळ्या प्रकारचा असतो. तो लाल येणे ताम्र वर्णी असतो, पित वर्णी देखील असू शकतो, तसाच तो नील वर्णी देखील असू शकतो.

ध्यान येणे डोळे बंद करून अथवा उघडे ठेवून केलेले आपल्या सद्गुरूंचे अथवा भगवंताचे स्मरण होय. या स्मरणात आपण त्यांची छबी अथवा रुप पाहण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याचबरोबर त्यांचे नामस्मरण देखील करीत असतो.

आता बाबांनी म्हटल्याप्रमाणे, "काही ज्योती त्यांना प्रकाश हवा म्हणून ध्यान करीत नाहीत, तर ध्यान कशासाठी करतात? आपले काही बरे वाईट होऊ नये या भीतीपोटी 
भगवंताचे ध्यान करतात."

येथे प्रश्न पडतो की असे ध्यान कशासाठी करावे? ध्यान भीतीपोटी करावे काय? 

आपले काही बरे वाईट होऊ नये असे जर आपणास वाटत असेल, तर त्यासाठी आपण आपल्या वर्तणुकीत सुधारणा केली पाहिजे. आपले वर्तन, सद्वर्तनी ठेवावयास हवे. सदाचारी रहावयास हवे. आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या चार तत्त्वांनुसार वागावयास हवे. अशाप्रकारे आपण आपली स्थिती केली, तर ध्यानात मन रमून, आपल्या प्रकाशाची गतीही वाढीस लागून, आपल्याला आपल्या सताच्या दर्शनाचा लाभ होऊ शकेल आणि म्हणूनच आपले बाबा आपल्याला सांगताहेत, "भीतीपोटी ध्यानधारणा करु नका, तर *ध्यानधारणा भगवंताला पाहण्यासाठी करा.*

पुढे बाबा म्हणतात, "हे सर्व करण्यापेक्षा (म्हणजे भीतीपोटी ध्यान करण्यापेक्षा) आपण असे म्हटले पाहिजे, *" अनंता ! ही आपलीच कृपा आहे. आपल्या चरणांचा आम्हाला ठाव द्या, म्हणजेच स्वप्रकाश द्या, म्हणजे स्वप्रकाशाने मला पूढची वाटचाल करता येईल", मला आपल्या चरणांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.* 

 "हे सता !" "स्वप्रकाश नसेल तर मला कुठेही जाता येणार नाही. त्रिगुणांच्या प्रकाशाच्या अनुषंगाने गेलो तर मला ते अजून मायेत गुरफटवतील." 

बाबा पुढे सांगतात, *लक्षात ठेवा, गरीबी परवडली पण अमीरी नको.* 

म्हणूनच आपले बाबा म्हणतात, आपण काय म्हटले पाहिजे, *"सता !" आम्हाला काय पाहिजे तर केवळ तुमचे चरण!"* 

स्वप्रकाशाची मागणी या करीता आहे. ही मागणी तुम्ही मागितली अन् त्यांनी तुम्हाला दिली तर तुमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही. अन् अशा गतीने प्रत्येक भक्त जाऊ लागला तर, एकनाथांनी सांगितले ते योग्यच आहे. 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सर्व संतमंडळी या गुरुकुलातल्याच ज्योती होत. स्थुल सुटल्यानंतर त्यांना परत गुरुकुलातच सामावून घेतले जाते. सत त्यांना ज्या ज्यावेळी आवश्यकता असेल, त्या त्यावेळी कर्तव्यासाठी आदेश देऊन पाठवितात. हे अनुभवसिद्ध आहे म्हणूनच एकनाथांनी अनुभवसिद्ध मागणी केली. मागितले काय? तर फक्त *स्वप्रकाश!"*

आपण पहातो लोक वेगवेगळे उपास तापास करीत असतात. शरीराला झीजवत असतात. पण लक्षात ठेवा ! *शरीर हे आत्म्याचे मंदिर आहे. हे शरीररूपी मंदिर आत असणा-या *मा* चे म्हणजेच *आत्म्याचे* मंदिर 
समजून ठेवल्यानंतरच, आतमध्ये मन स्थिर राहील.*

(13) क्रमश:

Wednesday, August 21, 2019

बुलबुल

झावळीवर बसली, बुलबुलांची जोडी
कावळा करु लागला, त्यातच लाडीगोडी
त्या जोडीला ही, लाडीगोडी कांही रुचेना
कावळ्याच्या गोडीगुलाबीला, ती जोडी काही फसेना

बुलबुलांची जोडी,
कावळ्याची लाडीगोडी,
दूर दूर जाई जोडी
थोडी थोडी थोडी थोडी......

Tuesday, August 20, 2019

काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

      *गुरुराज स्वामी आता स्वप्रकाश |*
       *जयापूढे उदास चंद्र रवी ||*
                (भाग दूसरा)
        
  *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल*
        *नांदतो केवळ पांडुरंग*

चोखोबा कोण होते? तर विठ्ठलाच्या देवळात झाडू मारणारे एक भक्त. 

विठ्ठलाला चोखोबा महार आहेत याचे सोयर सुतक नव्हते. विठ्ठल कोण होते? तर साक्षात भगवंत. भगवंताला जाती, पाती काहीही नसते, मग त्यांचा भक्त जातीने कुणी कां असेना? ह्या जाती-पाती कोणी निर्माण केल्यात? तर समस्त मानवानीच नां?

पण तोच चोखोबा म्हणतो, "काया हिच पंढरी आहे" आपली काया म्हणजे आपले शरीर अर्थात आपला हा पंचमहाभूतांचा देह, तर हिच पंढरी आहे. म्हणजेच पांडुरंगाचे स्थान असलेले ठिकाण आहे. अन् त्या देहाच्या पंढरीत हा विठ्ठलरुपी आत्मा आत विठेवर वास करीत आहे ह्याची आपले बाबा आपल्याला जाणीव करून देतात.

बाबा पुढे विचारणा करतात, "आम्ही पंढरपूर कोठे पहातो अन् आमच्या चोखोबाने पंढरपूर कोठे पाहिले? चोखोबा अडाणी असून त्याला हे कळले, मग तुम्ही सांगा, अडाणी श्रेष्ठ कि सुशिक्षित श्रेष्ठ! 

परम् श्रेष्ठ आपल्या बाबांनी म्हटलेलेच आहे, तसेच 
संतानी देखील सांगितलेलेच आहे, *जेथे मांडीले ढोंग, तेथे कैचा आला पांडुरंग* म्हणजेच जेथे ढोंगच ढोंग मांडलेले आहे, अशा ठिकाणी पांडुरंग कसा बरे येईल?

म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, "ज्या ठिकाणी ढोंग आहे तेथे पांडुरंग कसा बरे येईल आणि कुठून येईल? 

*पांडुरंग म्हणजे शुभ्र प्रकाश, पांडुरंग म्हणजे भगवंत !* अशा ठिकाणी तो तेथे स्थिर राहू शकेल का?* 

तो जर स्थिर रहावयाचा असेल, तर त्याकरीता आपली सद्गुरू माऊली म्हणते, "भक्ताने ढोंग रहित होणे गरजेचे आहे. सतशुध्द गतीने वाटचाल करने गरजेचे आहे. मगच तो स्वप्रकाश पहाता येईल. 

त्याकरीता परम् पूज्य श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"सेवेक-यानों, मायारहित व्हा, शुद्ध व्हा. सर्वस्व जीवन हे त्यांचेच (म्हणजे सताचे) आहे."*

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे, आपण केवळ निमित्त (मात्र) आहोत. या मृत्युगोलार्धात, जन्म घेणे अन् अदृष्य होणे हा सिद्धांत आहे. सतयुगापासूनचे ऋषी-मुनीं आजदेखील सानिध्यात आहेत. ते आपल्या (अध्यात्मिक) शक्तिच्या जोरावर अदृष्यही होऊ शकतात.

म्हणून पुढे बाबा म्हणतात, *"ही शक्ति तुम्ही सुद्धा कमाऊ शकता, पण केव्हा तर स्वप्रकाश मिळेल तेंव्हा."* 

*स्वप्रकाश मिळाला नाही तर तुम्ही काही करु शकणार नाही. मग पुनरपी जननम्, पुनरपी मरणम्!* 

चौर्याऐशी लक्ष योनी तुमची वाट पहातच असते. मानव योनीचा फेरा चुकला अन् उरलेल्या त्र्याऐशी लक्ष योनीत जर तुम्ही भटकत राहिलात, मग तुम्ही सत् सानिध्यात कधी येणार? अशी विचारणा आपले बाबा आपणांस करतात.

आणि पुढे जाणीव करून देताना म्हणतात, *हक्काने मानव जन्म मिळाल्याखेरीज सद्गुरु सानिध्य मिळणे दुरापास्त आहे.* 
(14)  क्रमश:

Tuesday, December 25, 2018

नमो नमो श्री सद्गुरू राया

👏👏👏

*नमो नमो श्री सद्गुरू राया*
*नतमस्तक करीतो मी काया*
*यावे सत्वर उद्धराया*
*या दत्तजयंती शुभदिनी*

*अनगड म्हणे, हे देवा*
*मान्य करूनी घ्यावी सेवा*
*नामस्मरण हा अपुला ठेवा*
*स्मरतो दत्तजयंती शुभदिनी*

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

ज्ञान* येणे *प्रकाश

👏👏👏

*_ज्ञानेश सांगत आहेत, जर (तुम्ही) सतमय असाल, तर मुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही._*

*ज्ञानेश* येणे ज्ञान + ईश = ज्ञानेश हा झाला व्याकरणातील संधी. ह्याचा आध्यात्मिक त-हेने बोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपणास काय आढळून येईल? 

*ज्ञान* येणे *प्रकाश*
*ईश* येणे *ईश्वराचा*
येणे
*ईश्वराचा प्रकाश*
हा आपणास मिळाला असता, आपणास त्या ईश्वराच्या प्रकाशातच *ईश्वर कसा आहे?*, *ईश्वर कोण आहे?* हे स्वतः *ईश्वरच* आपणास दाखवून देत असतो. आणि हे ज्यावेळेस आपणास कळून येते, त्यावेळेस आपल्यातील द्वैत भावनाचा लोप पावून, आपणास तो *ईश्वर* म्हणा, तो *देव* म्हणा अद्वैताकडे आपणास घेऊन जातो.

एकदा का अद्वैताचा अनुभव आपणास मिळाला की सर्वस्वातील फोलपणा आपल्याला दिसून आल्यावर, तो मानव सतभक्तीत रममाण होतो. मग अशावेळी मुक्ती मोक्ष उरतच नाही. सताचे चरण प्राप्त होणे हाच आपला मुक्ती आणि मोक्ष होऊन जातो आणि ख-या अर्थाने तोच मुक्ती मोक्ष होय.

👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏

देवाचा मिसकाँल..

🌹 *OM SHRI SADGURU MAULI* 🌹

                    *देवाचा मिसकाँल..*

         हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलेलाच आहे...... आपला मोबाईल फ़ोन घरातच कुठेतरी ठेवलेला असतो आणि नेमका तो वेळेला सापडत नाही..... मग आपण काय करतो...... अस्वस्थ होतो काही सुचत नाही...... मग एकच उपाय घरातील पतीला किंवा पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या मोबाईल वरुन रिंग द्यायला सांगतो...... मग आपला फ़ोन वाजला की त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि क्षणात आपल्याला आपला मोबाईल सापडतो...... असे जरी असले तरी तो काही पहिल्या फ़टक्यात सापडत नाही...... तीथे सुद्धा एक दोन वस्तु उलट सुलट कराव्या लागतात..... तेव्हा तो सापडतो...... पहा साधा फ़ोन..... आवाजाचा वेध घेवुन चटकन सापडत नाही......

मग सगळीकडे भरुन उरलेला परमेश्वर आपल्याला चटकन सापडेल का ? मग आपण काय करतो ? कुठे मठात जा..... देवळात जा.... बाबा महाराजांकडे जा.... कुठे देवाला..... झाडाला फ़ेऱ्या घाल..... कुठे धागा बांध एक ना अनेक.....

शेवटी काय.... निराश होवुन थकुन जातो.... आणि अचानक आपले पुर्वपुण्य उदयाला येते.... आणि आपण आपले गुरु सद़्गुरु संत यांचे चरणी शरण जातो..... आणि सांगतो सगळीकडे शोधले..... पण देव काही सापडत नाही..... मग गुरु.... सद़्गुरु.... संत सांगतात बाळा ! जरा शांत हो.... निवांत बैस.... मी तुला काही साधन (नामस्मरण, उपासना, इत्यादी) सांगतो.... त्याने तुझी डाउन झालेली बॅटरी  प्रथम चांगली चार्ज होईल..... ती एकदा छान चार्ज झाली की *मग मी “मिस कॉल” देतो देवाच्या मोबाईलवर*..... मग त्याचा रिंगटोन तुला ऐकायला येईल..... त्या आवाजाच्या दिशेने गेलास..... की देवाचा मोबाईल तुला सापडेल...... तो सापडला की.... त्या मोबाईलचा मालक “देव” तुला सापडेलच..... म्हणजेच उपासनेच्या शेवटी.... *देवा भक्ता अखंड भेटी*.....

करता करता तो दिवस उजाडतो.... जेव्हा आपले भाग्य उजळते..... आपली बॅटरी छान चार्ज झालेली असते.... मग अशावेळी आपले गुरु सद़्गुरु संत देवाला miss call देतात... आणि त्याचा रिंगटोन आपल्याच हृदयात वाजायला लागतो.......

मग आपण म्हणतो अरेरे ! उगाचच इकडे तिकडे शोधत फ़िरत होतो..... देव तर इथेच आहे माझ्या हृदयात..... सदा सर्वदा वस्तीला..... आता शोधाशोध करायची गरजच नाही......त्याचा रिंगटोन हरघडी वाजतोच आहे.... दोष आपलाच आहे.... की तो आपण ऐकत नाही किंवा तो आपल्याला ऐकायला येते नाही.....

*एक गुरुकृपा झाली की मगच तो ऐकायला येवु लागतो.🙏🏻*
साभार: आंतरजालावरून

मुक्ती 2

👏👏👏

*मुक्ती - भाग 2*

कालच्या भागात आपण मुक्तीचे चार प्रकार पाहिले.
त्या पुढीलप्रमाणे होत्या -

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

*समीप* या शब्दाचा अर्थच मुळी जवळ असा आहे. मुक्तीच्या बाबत समीपता म्हणतो, तो अर्थ म्हणजे देवाच्या सान्निध्यात जाणे किंवा जवळ जाणे होय.

*देवाचे सान्निध्य कधी प्राप्त होते?*
देवाचे सान्निध्य एक तर देवाची उपासना केल्याने प्राप्त होते किंवा ते पुण्याई मुळे प्राप्त होते. देवाची उपासना या जन्मातील असू शकते किंवा ती अगोदरच्या जन्मातील सुद्धा असू शकते. त्याचप्रमाणे पुण्याई देखील या जन्मातील वा पूर्व जन्मातील असू शकते. पुण्याईचा अर्थ पुण्य कर्म, हे ज्या मानवाकडून घडले, तो भाग्यवान होय. ह्यामुळेच तो मानव देवाच्या जवळ जाऊ शकतो, अन्यथा नाही.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

या उदाहरणातून तुकाराम महाराज म्हणतात,"पुण्यामुळे देवकी मातेच्या गर्भात श्रीकृष्णाने जन्म घेतला."

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

*देव लोक कधी प्राप्त होतो?*
पहिली पायरी देवाच्या जवळ जाणे, तर ही पुढची पायरी होय.  यामध्ये आपण ज्या देवाची उपासना करतो, त्या देवाच्या लोकी जातो असे म्हटले जाते आणि ही पायरी आपणास तप केल्याने प्राप्त होते असे म्हटले जाते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

तुकाराम महाराज येथे म्हणतात,"जर कां मानवाला वैकुंठ म्हणा, कैलासी म्हणा किंवा स्वर्गात जावयाचे असेल तर त्याला तपःश्चर्या ही करावी लागते. तपसाधना केल्याशिवाय हे देव लोक गाठणे मानवाला शक्य होणार नाही.

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*देवाचे रूप कशाने प्राप्त होते?*
तिसरी पायरी म्हणजे देवाचे रूप प्राप्त होणे होय. म्हणजेच मानवाला हे समजने की मी देवात आणि देव माझ्यात कसा सामावलेला आहे. ज्यावेळेस या रूपाची जाणीव मानवाला होते, त्याचवेळेला तो ख-या अर्थाने देवाशी एकरूप होतो. त्याचा अद्वैत भाव जागृत होतो. आणि हे फक्त ध्यानधारणेमुळे होऊ शकते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||*

आपण ज्याचे ध्यान करू, तेच रूप आपल्या मनाशी साकारते व आपण व ते कसे एक आहोत, ह्याची जाण आपणाला होते.

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*ब्रह्मरूप कसे होता येईल?*
वरील तीन पाय-यांच्या पुढील व शेवटची पायरी म्हणजे सायुज्यता, येणे मोक्ष. एकदा का आपले मन त्या भगवंताशी मनाने तादात्म्य पावले की तो मानव हा मानव न राहता, देवत्वास जाऊन मिळतो. म्हणजेच तो त्या भगवंतात एकरूप, एकलय होऊन जातो. त्याला कशाचे भान राहत नाही, त्याला कशाची भ्रांत राहत नाही. अर्थात तो आणि भगवंत एक होतात. हाच तो मुक्ती मोक्ष.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,"त्या *नामातच* चारही मुक्ती अंतर्भूत आहेत, असे ग्रंथ सांगतात."

शेवटी ह्या सर्वस्वातून काय निष्पन्न होते, तर *नाम* हेच मुक्ती दाता, *नाम* हेच मोक्ष दाता. *नामा* परते अन्य काहीही साधन नाही. म्हणूनच *नामा* बद्दलच सर्व साधु-संतांनी, ऋषीमुनींनी उहापोह केलेला आहे आणि *नामा* वरच सर्वस्व भर दिलेला आहे.

अनगड आपणास आठवण करून देताना म्हणतात,"आपल्या श्री सद्गुरू माऊलीने देखील *नामाचे* आणि *नामस्मरणाचे* महत्व आपल्या प्रवचनातून वेळोवेळी विशद केलेले आहे."

चार मुक्ती

👏👏👏

*चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली

बाबा जेव्हा म्हणतात चारही मुक्ती म्हणजे चारही देहांपासून मुक्ती. ते चार देह कोणते? तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह. या चारही देहांपासून मुक्ती कधी मिळते? 

*तर ती मुक्ती आपणांस मिळते, ज्यावेळेस आपण सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळवितो.*

आपणास कल्पना असेलच की, आपल्या मातेने ही मुक्ती ह्या कलियुगातच मिळविली. दिनांक 24 नोव्हेंबर 2018 च्या *गुह्यत्वाचा साक्षात्कार* यामध्ये याचे विवेचन आलेलेच आहे.  

याचप्रमाणे मुक्तीचे चार प्रकार देखील सांगण्यात आलेले आहेत. हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला *चार प्रकारच्या मुक्ती* मिळू शकतात, त्या पुढीलप्रमाणे होत--

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||* तुकाराम महाराज

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

यांत काय आहे?......

👏👏👏

*यात काय आहे?*

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की *यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *त्यात मीठ आहे.* संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले *यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *यात साखर आहे.* असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले *आणि यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *यात श्रीकृष्ण आहे.* सन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला *"महाराज तो रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो."*
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले *"अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्यागोष्टी साठी मी एवढा भटकलो घरदार सोडून सन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे"*. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय *काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकाना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.

👏💐👏💐👏💐👏💐👏💐
साभार आंतरजालावरून

भगवंताची प्राप्ती

👏👏👏

*मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे.*
- हे म्हणणे शत प्रतिशत खरे होय. पण कोणासाठी? तर जो सत् मार्गाने जाणारा असेल त्याच्यासाठी. जो असत् मार्गाने जाणारा असेल त्याला ह्याचे काय महत्व? जसे म्हणतात नां, गाढवाला गुळाची काय चव?

*भगवंत एकच ओळखतो* 
- जो त्याची भक्ती करतो, तो त्याला आवडतो, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा, वर्णाचा अथवा रंगाचा असो. ह्याचे उदाहरण म्हणजे *आपले बाबा* आणि *आपला सद्गुरू दरबार.* 

आपणा सर्वांना कल्पना आहेच की आपल्या दरबारात अनेक जाती-धर्मांच्या गुरूबंधु भगिनी आहेत. त्यामध्ये हिंदू धर्मातील तळागाळातील लोकांपासून ते उच्च वर्णीय लोकांचा जसा समावेश आहे, त्याचप्रमाणे इतर धर्मीयांचा देखील समावेश आहेच. 

प्रवचनकर्ते येथे विचारणा करताहेत - *भाग्यवान कोणाला म्हणावे?*
- येथे प्रवचनकार सांगताहेत, ज्याच्याकडे पैसा-अडका, धन-दौलत, घर-दार, जमीन-जुमला आहे, तो भाग्यवान नसून, ज्याच्याकडे किंवा ज्याच्या सोबत भगवंत आहे, तो खरा भाग्यवान होय. त्यासाठी ते म्हणतात, "भगवंत आपल्याला भेटणे हे ह्या जन्माचे उद्दिष्ट्य ठेवून, तसेच हे प्रत्येकाने आपल्या जीवनातील मुख्य कार्य समजून, तो आपणास कसा प्राप्त होईल, हे पाहावे."

पुढे ते म्हणतात, "पैसा भगवंताच्या आड येत नसतो, तर आपला अहंकार, आपला अहंभाव, आपल्यातील असलेला *मी* पणा, भगवंत प्राप्तीच्या आड येत असतो."

प्रवचनकर्ते *सेवेची* फोड करताना म्हणतात, *"मी सेवा करतो"* असे जे म्हणतात, त्यांच्याकडून भगवंताची खरी सेवा घडतच नाही आणि ह्याला कारण *सेवा करणारा* म्हणतो, *"मी सेवा करतो. तो असे म्हणत नाही की, ही सेवा भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत." त्या सेवेचा कर्तेपणा तो स्वतःकडे घेत असतो.* ह्याचाच अर्थ तो स्वतःचा अर्थ त्यात पाहतो, म्हणजेच तो स्वार्थ पाहतो, तो येथे परमार्थ पाहत नाही, परम् अर्थ तो पाहत नाही. त्यामुळे त्यामध्ये *मीपणाचा* भाव दिसून येतो.

पुढे ते म्हणतात, "भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म करतात, त्याला पुण्यकर्म म्हणतात."

पुढचा जो भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. त्यात ते म्हणतात, "भगवंत माझ्याजवळ आहेत, ही श्रद्धा ठेवून वागा." आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या सद्या सुरू असलेल्या प्रवचनांतून तेही आपणांस श्रद्धेच्या श्रेष्ठपणाबद्दलच सांगताहेत.

*सत्कर्म करणारे पुष्कळ असतात* असे ते पुढे म्हणतात. परंतु त्यामध्ये बरेच वेळा स्वार्थ बुद्धी असते, असेही ते म्हणतात. परंतु असे करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रकारे फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करावे असे ते सांगतात. आणि त्यांच्या मते तीच खरी भक्ती होय.

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

हृदयातील सद्गुरुंशी संवाद

👏👏👏

मधलं पान

माझं हे मधलं पान मला खूप काही देतं असतं - शिकवीत असतं. काही वेळापूर्वी मला म्हणालं की, कुठंही लांबवर शोधायला जायची गरज नाही. शांत बस आणि डोळे मिटून घे. मनात येणारे विचार येवू देतं, रोखू नकोस विचारांना. जसे विचार येतील तसेच विचार विलीन होतील.

*आता हृदयातील सद्गुरुंशी संवाद साधायचा आहे. तुझे सद्गुरु तुझ्या हृदयात वास करून आहेत - निवास करून आहेत. त्यांना शोधायची तुला गरज नाही, तुलाच त्यांनी शोधलंय नी तुझ्या हृदयात वास करून आहेत.*

शिष्यानी सद्गुरु शोधत फिरायचं नसतं तर सद्गुरुच योग्य शिष्यांची निवड करीत असतात.

*हृदयस्थ सद्गुरुंशी संवाद साधण्याची वेळ आता आली आहे. बघ सद्गुरु तुझी आतुरतेने वाट पहात आहेत. विनम्र होवून त्यांच्या चरणावर अहंकार समर्पित करून लीन हो, एकरूप हो, सर्वकाही तुला देणार आहेत. एकरूपता प्राप्त होताच संवादही होईल सद्गुरुंशी. नामात राहून सद्गुरुंच्या चरणी रहा, मरणानंतरची मुक्ती अनुभवण्यापेक्षा जिवंतपणी मुक्तीची अनुभूती घे कारण सद्गुरुच ही अनुभूती देतात. लागता ओढ सद्गुरुंच्या भेटीची, जाणीव होतं असते हृदयस्थ सद्गुरुंची. एक लक्षात येतंय की सद्गुरुंविना जीवन नाही - आयुष्य नाही. खरं ना, पटतंय ना.*

*जय श्री सद्गुरू माऊली*

साभार:  श्री. प्रदीप नरहरि केळकर

अनगडवाणी